
चिपळूण; वि.प्रतिनिधी (दिगंबर घाग) चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील निलिमा सुधाकर चव्हाण हिच्या मृत्यूनंतर चार दिवस उलटले तरी अद्याप या प्रकरणाचा उलगडा झालेला नाही.येथील पोलिसांवर राजकीय व सामाजिक संस्थांकडून दबाव वाढत आहे. अजूनही विविध सामाजिक संस्था व राजकीय स्तरावरून पोलिस ठाण्यात निवेदने दिली जात आहेत. यात महिला संघटना आघाडीवर आहेत.
आतापर्यंत राजकीय पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट, मनसे, भाजपनेही निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे; परंतु आता सामाजिक संस्थांकडून निवेदने देण्याचा ओघ वाढला आहे. हेल्प फाउंडेशन, डीबीजे महाविद्यालयाचे विद्यार्थी, कुणबी समाज, मुस्लिम समाज, नाभिक समाज, महिला फोरम व अन्य सामाजिक संस्थांकडून जोरदार आवाज उठवला जात आहे. यात काही नागरिकांनी वैयक्तिक स्तरावरील निवेदने पोलिसांना सादर केली आहेत. त्यामुळे पोलिसांवर लोकांच्या मागणीचा प्रभाव वाढत आहे. पावसाळी अधिवेशनातही या प्रकरणाचे पडसाद उमटले. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून पोलिसांचा कसून शोध सुरू आहे. निलिमाने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. निलिमाच्या मृत्यूचे गूढ कायम राहिले असून एक -दोन दिवसात त्याचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जाहिरात


जाहिरात

