
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत नागपूर दंगलीवर विस्तृत भाष्य केले. त्यात त्यांनी जनतेला एकमेकांप्रती आदरभाव बाळगून संयम राखण्याचे आवाहन केले. तसेच कुणी दंगल करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जात, धर्म न पाहता कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला. विशेषतः पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सरकार सोडणार नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 17 मार्च 2025 रोजी सकाळी 11.30 वा. नागपुरातील महाल परिसरात विहिंप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘औरंगजेबाची कबर हटाव’ असे आंदोलन केले. हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली. त्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला. दुपारी 3 वाजून 9 मिनिटांनी हा गुन्हा दाखल झाला.
प्रतीकात्मक कबरीच्या दहनावेळी धार्मिक मजकूर जाळल्याची अफवा…
त्यानंतर सायंकाळी एक अफवा अशी पसरवली गेली की, सकाळच्या आंदोलनात जी प्रतिकात्मक कबर जाळली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता. यामुळे अत्तररोडमधील नमाज आटोपून 200 ते 250 चा जमाव त्या ठिकाणी जमला. हा जमाव नारेबाजी करू लागला. याच लोकांनी आग लावून टाकू, असे हिंसक बोलण्यास सुरूवात केल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी बळाचा वापर केला. यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार द्यायची आहे, अशी मागणी केल्याने त्यांना गणेशपेठ पोलिस ठाण्यात निमंत्रित करण्यात आले.
एकीकडे पोलिसांची कारवाई सुरू असताना दुसरीकडे हंसापुरी भागात 200- 300 लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले. त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते. या घटनेत 12 दुचाकींचे नुकसान झाले. या घटनेत काही लोकांवर घातक शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. तिसरी घटना भालदारपुरा सायंकाळी 7.30 वा. झाली. तिथे 80 ते 100 लोकांचा जमाव होता. त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यामु्ळे अश्रुधूर व सौम्य बळाचा वापर करावा लागला. या घटनेत 1 क्रेन, 2 जेसीबी व काही चारचाकी वाहने जाळण्यात आली.
3 डीसीपींसह 33 पोलिस जखमी…
देवेंद्र फडणवीस म्हणाले, या संपूर्ण घटनेत 33 पोलिस जखमी झालेत. त्यात 3 उपायुक्त दर्जाचे पोलिस अधिकारी आहेत. त्यापैकी एका पोलिस उपायुक्तावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. एकूण 5 नागरीक जखमी झालेत. तिघांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. 2 रुग्णालयात आहेत. एक आयसीयूत आहेत. एकूण 3 गुन्हे गणेशपेठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेत. तहसील पोलिस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे एकूण 5 गुन्हे आहेत.
11 पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एन्ट्री पॉइंटवर नाकाबंदी लागू करण्यात आली आहे. यात तहसील, गणेशपेठ, कोतवाली, पाचपावली, लकडगंज, शांतीगंज, सकरदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर, कपील नगर या ठाण्यांचा समावेश आहे. एसआरपीच्या 5 तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. राज्याच्या पोलिस महासंचालकांनी सर्वच सीपी, एसपी यांची व्हिसी घेऊन राज्यभर कायदा सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिलेत.
सायंकाळी जाणिवपूर्वक हिंसाचार झाला…
एकूणच यामध्ये आपण पाहिले तर दिसते की, सकाळी एक घटना घडल्यानंतर मध्यंतरीच्या काळात शांतता होती. पण त्यानंतर सायंकाळी काही लोकांनी जाणिवपूर्वक अशा प्रकारचा हल्ला केल्याचे दिसून येते. याचे कारण म्हणजे, घटनास्थळी एक ट्रॉलीभरून दगड आढळलेत. काही लोकांनी आपल्या घरावर दगड जमा करून ठेवले होते. या प्रकरणी शस्त्रही मोठ्या प्रमाणात आढळले. ते जप्त करण्यात आलेत. वाहनांची जाळपोळ झाली.
ते पुढे म्हणाले, समाजकंटकांनी ठरवून काही ठराविक घरांना, काही ठराविक आस्थापनांना लक्ष्य करण्यात आलेत. 3 डीसीपी लेव्हलचे अधिकारी या प्रकरणी जखमी झालेत. यातील एका डीसीपीवर थेट कुऱ्हाडीने वार करण्यात आला आहे. त्यामुळे निश्चितपणे यामध्ये एक सूनियोजित कट दिसून येत आहे. अशा लोकांवर कारवाई केली जाईल. कुठल्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था हाती घेण्याची कुणालाही परवानगी देण्यात येणार नाही. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना काहीही झाले तरी सोडले जाणार नाही हे मी स्पष्ट करतो. पोलिसांवरील हल्ला सहन केला जाणार नाही. पोलिस शांतता प्रस्थापित करत होते. अशावेळी पोलिसांवर केलेला हल्ला अतिशय चुकीचा आहे.
खरे म्हणजे, महाराष्ट्रात कायदा सु्व्यवस्था राखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. मी नागपूरसह सर्वच जनतेला विनंती करतो की, सर्वच समाजाचे धार्मिक सण, हे या कालावधीत सुरू आहेत. अशा या परिस्थितीत सर्वांनी संयम बाळगावा. कुणीही संयम सोडू नये. आपल्याला कायदा व सुव्यवस्था कशी राखता येईल, एकमेकांप्रती आदरभाव कसा राखता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न सर्वांनी करावा असे मी आवाहन करतो.
‘छावा’ चित्रपटामुळे लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या…
मुख्यमंत्र्यांनी यावेळी छावा चित्रपटामुळे जनतेच्या भावना प्रज्वलित झाल्याचाही दावा केला. आज महाराष्ट्रात छावा या चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेपुढे आणला. पण त्यानंतर राज्यात लोकांच्या भावना देखील एकप्रकारे प्रज्वलित झाल्या आहेत. औरंगजेबाविषयीचा राग मोठ्या प्रमाणात बाहेर येत आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याठिकाणी असल्या तरी मला असे वाटते की, महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांनी संयम बाळगला पाहिजे. महाराष्ट्र एक प्रगतीशील राज्य आहे. या राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. येथील सामाजिक घडी योग्य प्रकारे राहिली तर आपण आज ज्या दिशेने जात आहोत, त्या दिशेने जाण्यास आपल्याला मदत होईल. आणि म्हणून निश्चितपणे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शांतता राखण्याचे मी आवाहन करतो.
कुणीही या प्रकरणी दंगल करण्याचा प्रकार केला, तर त्याचा जात, धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल. विशेषतः पोलिसांवर कुणी हल्ला केला तर त्याला सोडले जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.