
*रत्नागिरी:* घरात कुणालाही न सांगता निघून गेलेल्या तरुणाचा मृतदेह हातखंबा-तारवेवाडी येथील बंद चिरेखाणीच्या सापडला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रसाद शंकर आंबेकर (वय २६) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना २९ मे २०२५ दुपारी दोनच्या सुमारास घडली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रसाद आंबेकर हे २९ मे दुपारी घरात कुणालाही न सांगता निघून गेला होता. त्याचा आजूबाजूच्या परिसरात व नातेवाईक, मित्रांकडे शोध घेतला तो सापडला नव्हता. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली होती. पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. रविवारी (ता. १) सकाळी अकराच्या सुमारास प्रसाद आंबेकर यांचा भाऊ त्याला शोधण्यासाठी पाली येथे गेला असताना हातखंबा पोलिस पाटील सचिन सावंत यांनी फोन करुन तारवेवाडी-साईनगर हातखंबा येथील सचिन बोंबले यांच्या बंद चिऱ्याच्या खाणीत पाण्यामध्ये एका पुरुषाचे प्रेत तरंगत असल्याचे सांगितले. त्यांचा भाई लगेचच पाली येथून हातखंबा तारवेवाडी येथील बंद चिऱ्याचे खाणीजवळ आले असता खाणीत पाहिले असता पाण्यामध्ये तरंगत असलेले प्रेत हो प्रसादचे असल्याची ओळख पटली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.