मुंबईकरांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, मुंबईकरांचं पाणी कपातीचं टेन्शन होणार दूर

Spread the love

उन्हाच्या तडाख्याने मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव तळ गाठत असून येत्या काही दिवसांत मान्सूनचे आगमन न झाल्यास पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने धरणांमधील राखीव साठ्यातील १५० दशलक्ष लीटर पाणी मुंबईला देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. राखीव साठ्यामुळे मुंबईत आणखी एक ते दीड महिना म्हणजे जुलै अखेरपर्यंत पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे.

तानसा, मोडकसागर, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. ५ जून रोजी सातही धरणांत ११.५८ टक्के म्हणजे १ लाख ६७ हजार ५४९ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.

पावसाचे आगमन लांबणीवर पडल्यास मुंबईला अतिरिक्त पाण्याची गरज भासू शकते. यासाठी राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा व भातसा धरणातून प्रत्येकी ७५ हजार दशलक्ष लिटर अतिरिक्त राखीव पाणीसाठा मिळावा, अशी मागणी पालिकेने सरकारकडे केली होती. याबाबत मुंबई भाजपचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी आयुक्तांनी राज्य शासनाने आपला अतिरिक्त पाणी साठा पालिकेला देण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती दिल्याचे ॲड. शेलार यांनी सांगितले. शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे याबाबत आभार मानले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page