
अनधिकृत बांधकामांविरोधात उपोषणाला बसणाऱ्या रोहीदास मुंडे यांना खोचक टोला
दबाव वृत्त ; दिवा शहरातील अनाधिकृत बांधकामाविरुद्ध भाजप दिवा मंडळाच्या अध्यक्षांनी दिनांक २० जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यावर उत्तर देताना शिवसेना उपशहरप्रमुख अँड.आदेश भगत यांनी म्हटले आहे की, दिवा भाजप अध्यक्षांच्या मते दिवा शहर बकाल होण्यापासून वाचवायचं असेल व त्यांच्या मते क्लस्टर योजना धोक्यात येत असेल तर भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदा आपले पदाधिकारी करत असलेली अनधिकृत बांधकामं थांबवावीत व त्यांनतर अनाधिकृत बांधकामांविरुद्ध उपोषणाला बसावं असा खोचक टोला लगावला आहे. शिवसेना पदाधिकऱ्यांवर विशेषतः माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्यावर पाच वर्षांपासून करत असलेले आरोप भाजप अध्यक्ष कधी सिद्ध करणार याची तारीख सुद्धा त्यांनी जाहीर करावी.

महाराष्ट्रात शिवसेना भाजप युती चे सरकार चांगल्या प्रकारे काम करत असताना दिवा शहरात भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी विनाकारण शिवसेनेला लक्ष करून युती मध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेना उपशहरप्रमुख अँड.आदेश भगत यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, दिवा शहरात शिवसेना भाजप मध्ये वाद नसून भाजप मधील काही निवडक पदाधिकारी विनाकारण दोन्ही पक्षांमधील संबंध बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय जनता पार्टीने दिवेकरांच्या प्रश्नांविषयी नक्कीच आवाज उठवला पाहिजे पण हा आवाज उठवत असताना उठवलेल्या प्रश्नांवर प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना पक्ष व शिवसेना पदाधिकाऱ्यांना मध्ये ओढण साफ चुकीचं आहे. दिवा शहरात शिवसेनेची मोठी ताकद असून आठ नगरसेवक आहेत. दिवावसीयांचा देखील शिवसेनेला मोठा पाठिंबा आल्याचे सातत्याने दिसून आले आहे. असे असताना महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीत लढल्यास आपल्याला जागा मिळणार नाही अशी असुरक्षतेतीची भावना निर्माण झाल्यामुळेच काही भाजप पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे मुद्दामून एकतर्फी वाद उकरून शिवसेना भाजप मधील संबंध बिघडल्याचे खोटं चित्र लोकांसमोर उभं करून स्वबळाची भाषा केली जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दिवा शहर दौऱ्याच्या वेळेस अनधिकृत बांधकामांचा प्रदर्शन भरवून आंदोलनाचा इशारा देणाऱ्या भाजप अध्यक्षांनी आयत्यावेळी अचानक चुप्पी का साधली? मुख्यमंत्री दिवा दौऱ्याच्या दिवशी त्यांनी ते प्रदर्शन कुठे भरवलं होतं? हे देखील भाजप अध्यक्षांनी जाहीर करावं. व्यावसायिक, ठेकेदार आणि प्रशासनाविरुद्ध मोठ आंदोलन जाहीर करून त्यानंतर ते स्थगित करायचं हे भाजप अध्यक्ष मागील पाच वर्षापासून सातत्याने करत आहेत. दिवा भाजप अध्यक्षांच्या मते दिवा शहराला बकाल होण्यापासून खरंच वाचवायचं असेल व उपलब्ध सुखसुविधांवर ताण निर्माण होत असेल तर, भाजपने प्रथमतः आपले पदाधिकारी करत असलेली अनाधिकृत बांधकामे ताबडतोब थांबवावी किंवा त्यांच्याविरुद्ध तोडक कारवाई करून एक चांगला आदर्श प्रशासना पुढे घालून द्यावा असे आवाहन अँड.आदेश भगत यांनी केलं आहे.
जाहिरात
