
वैभव सूर्यवंशी याने केलेल्या चाबूक खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर डोंगराएवढं आव्हान ठेवलं होतं. भारताने या धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला गुंडाळून वर्ल्ड कप जिंकला.
हरारे- म्हात्रे याच्या नेतृत्वात टीम इंडिया अंडर 19 वर्ल्ड कप चॅम्पियन ठरली आहे. टीम इंडियाने आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लंडवर एकतर्फी विजय मिळवला आहे. वैभव सूर्यवंशी याने केलेल्या 175 धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर भारताने हरारे स्पोर्ट्स कल्बमधील स्टेडियममध्ये इंग्लंडसमोर 412 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला भारतीय गोलंदाजासमोर पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. भारताने इंग्लंडला 40.2 ओव्हरमध्ये 311 रन्सवर गुंडाळलं. भारताने अशाप्रकारे अंतिम सामन्यात 100 धावांनी विजय मिळवला. भारताने यासह वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. भारताची अंडर 19 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याची ही सहावी वेळ ठरली.
केलेब फाल्कनरची शतकी झुंज अपयशी…
इंग्लंडच्या फलंदाजांनी विजयी धावांचा पाठलाग करताना झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंगसाठी आलेल्या केलेब फाल्कनर याने अखेरपर्यंत झुंज दिली. केलेबने शतक करत भारताला सहज जिंकू दिलं नाही. केलेबने इंग्लंडला विजयी करण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र भारताच्या डोंगराएवढ्या आव्हानासमोर त्याचे प्रयत्न अपुरे ठरले. केलेबने इंग्लंडसाठी सर्वाधिक 115 धावांचं योगदान दिलं. ओपनर बेन डॉकिन्स याने 66 धावा केल्या. बेन मेस याने 45 धावा जोडल्या. या व्यतिरिक्त इंग्लंडच्या इतर फलंदाजांनी झटपट आऊट होणं मैदानाबाहेरचा रस्ता धरला.
टीम इंडियासाठी आरएस अंब्रिश याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. दीपेश देवंद्रन आणि कनिष्क चौहान या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर खिलान पटेल आणि कॅप्टन आयुष म्हात्रे या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
वैभव सूर्यवंशीचा झंझावात…
त्याआधी कर्णधार आयुष म्हात्रे याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. भारताने यासह इतिहास घडवला. भारताने अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या बाद फेरीतील सर्वोच्च धावसंख्या उभारली. वैभव सूर्यवंशी याच्या तोडफोड खेळीच्या जोरावर भारताने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 411 धावा केल्या. वैभवने 15 चौकार आणि 15 षटकारांसह 80 चेंडूत 175 विस्फोटक खेळी केली. कॅप्टन आयुष म्हात्रे याने 53 धावा केल्या. तसेच इतर प्रमुख फलंदाजांनी योगदान देत त्यांनी आपली भूमिका चोखपणे पार पाडली.
टीम इंडिया वर्ल्ड कप चॅम्पियन…भारताकडून इंग्लंडचा फायनलमध्ये दुसऱ्यांदा धुव्वा..
अंडर 19 टीम इंडियाची इंग्लंड विरुद्ध वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याची ही एकूण दुसरी वेळ ठरली आहे. भारताने याआधी 2022 साली 5 फेब्रुवारीला इंग्लंडला पराभूत करत पाचव्यांदा अंडर 19 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली होती.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*