भाट्ये समुद्रकिनारी मासेमारी बोटीसह टेंपो जळून खाक….

Spread the love

*रत्नागिरी:* रत्नागिरी शहरानजीक भाट्ये येथे मासेमारी बोट जळून खाक झाली. ही दुर्घटना आज रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. दुर्घटनेवेळी बोटीच्या डागडुजीचे काम सुरू असल्याची माहिती मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेत बोट पूर्णतः जळून खाक झाली असून बोट मालकाचे जवळपास काही लाखांचे नुकसान झाले आहे.

सध्या कोकणात पावसाळा सुरू असून यामुळे समुद्रातील मासे मारी बंद आहे. मासेमारी हंगाम दोन महिने बंद असल्याने मासेमारी नौका किनाऱ्यावर नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. अनेक नौका मालकांनी मासेमारी नौकांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. रविवारी भाट्ये समुद्र किनारी देखील मासेमारी बोटीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते.

भाट्ये येथील बोट मालक आसिफ जावेद वस्ता यांनी देखील आपल्या बोटीच्या डागडुजीचे काम हाती घेतले होते. भाट्ये येथे खाडीलगत बोटीच्या डागडुजीचे काम सुरू होते. गॅस वेल्डिंग मशिनच्या माध्यमातून काम सुरू असताना अचानक बोटीने पेट घेतला. शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याची माहिती घटनास्थळावरील ग्रामस्थानी दिली. सुरुवातीला किरकोळ स्वरूपात असलेली आग बघताबघता रौद्र रूप धारण केले. अवघ्या काही कालावधीत बोटीला आगीच्या महाकाय ज्वालानी वेढले. यावेळी दुर्घटनाग्रस्त बोटीच्या नजिकच असलेला एक टेम्पो देखील जळून खाक झाला. तर बोटीला लागलेल्या आगीत अन्य बोटीचे देखील नुकसान झाले आहे.

बोटीला आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. या दुर्घटनेची माहिती पोलिस यंत्रणा आणि मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. बोटीला आग लागल्यानंतर उठलेल्या ज्वाला इतक्या उंच होत्या की भाट्ये पुलावरून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी पुलावर थांबून या दुर्घटनेचे छायाचित्रण केले. या आगीत कोणतीही मनुष्यहानी झाली नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे. मात्र आगीत बोट पूर्णतः जळून खाक झाली. रविवारी सायंकाळी पोलिसांकडून दुर्घटनाग्रस्त बोटीचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page