रत्नागिरी, :- गुहागर, दापोली, गावखडी यासारख्या समुद्र किनारी चरस सारखे अंमली पदार्थ ऑगस्ट महिन्यापासून आढळत आहेत. तेथील स्थानिकांना ते मिळतात आणि ते विकायला जातात. अशांवर गुन्हे दाखल होत आहेत. तटरक्षक दलाने त्याबाबत लक्ष ठेवावे, अशा सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिल्या.
जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. यावेळी अपर जिल्हा पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड पोलिस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात उपस्थित होत्या. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले, आंग्रे, जेएसडब्लू सारखे पोर्ट आहेत. याठिकाणी परदेशी लोक येत असतात. त्यांच्यामार्फतही अंमली पदार्थांचा व्यवसाय होऊ शकतो. त्यामुळे कोस्टल भागामध्ये विशेषत: कस्टमच्या अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे. अन्न औषध प्रशासनाकडून होणाऱ्या तपासण्यांबाबतही त्यांनी आढावा घेतला. अन्न व औषध प्रशासनाकडून नियमित औषध दुकांनाची तपासणी केली जाते. त्यांना प्रशिक्षण दिले जाते. प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधे दिली जात नाहीत याचीही खातरजमा करण्यात येत असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील बंद कंपन्यांचीही तपासणी करण्यात आली असून त्यामध्येही काही सापडले नसल्याचे त्यांनी सांगितले.
अमंली पदार्थांबाबत जनजागृती करण्यात येते. तसेच अशा रुग्णांचे समुपदेशन करण्यात येते. सद्यस्थितीला अशा प्रकारचे रुग्ण शासकीय रुग्णालयात नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॕ फुले यांनी दिली.
जाहिरात