मिनी मंत्रालयावर शिवसेनेचाच झेंडा; जिल्ह्यात शिवसेनेला सर्वाधिक 41 जागा…

Spread the love

रत्नागिरी:- ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या आणि मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेना, भाजप महायुतीने आपला झेंडा रोवला आहे. सोमवारी जाहीर झालेल्या मतमोजणीच्या निकालात जिल्हा परिषदेच्या 56 पैकी तब्बल 41 जागा जिंकत शिवसेना नंबर वनचा पक्ष ठरला आहे. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 5 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 5 जागा मिळाल्या भाजपला प्रथमच चार जागांवर विजय मिळाला आहे. जिल्हा परिषदेत प्रथमच मनसेचे खाते उघडले असून मनसेचा एक उमेदवार गुहागर मधून विजयी झाला आहे. जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांपैकी 8 ठिकाणी शिवसेना आणि भाजपा महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. तर चिपळूण पंचायत समिती मात्र त्रिशंकू स्थितीत आहे.

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 56 आणि नऊ पंचायत समित्यांच्या 112 जागांसाठी रविवारी 55.76 टक्के मतदान झाले होते. सोमवारी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सकाळी दहा वाजल्या पासून मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीत शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व राखत जिल्हा परिषदेच्या 56 पैकी 41 जागांवर विजय मिळाला. शिवसेनेने निकालात निर्विवाद वर्चस्व मिळवले असले तरी शिवसेनेकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहीलेल्या दोन उमेदवारांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. देवरुख मधली कोसुंब गटातून माजी आमदार सुभाष बने यांचे पुत्र तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांचा भाजपा उमेदवार प्रमोद अधटराव यांनी पराभव केला. तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रचना महाडिक यांचा कसबा मतदारसंघातून पराभव झाला.

मिनी मंत्रालयाच्या सर्वाधिक 41 जागा जिंकत शिंदे यांची शिवसेना जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. शिंदे यांच्या शिवसेनेने जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 46 जागा लढवल्या होत्या. यापैकी रत्नागिरी तालुक्यातील 10 पैकी 10 जागांवर शिवसेनेचा विजय झाला. दापोलीतील 6, खेड मधील 6 जागांवर शिवसेनेने तर एका जागेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाने विजयश्री खेचून आणली. मंडणगड तालुक्यातील 2 पैकी 2 जागांवर शिवसेनेला यश मिळवले.चिपळूण तालुक्यातील 9 जागांपैकी शिवसेना आणि आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने प्रत्येकी 3 जागांवर विजय मिळवला. 2 जागांवर भाजप तर एका जागेवर उबाठाचा उमेदवार विजयी झाला. गुहागर तालुक्यात शिवसेनेने 2, भाजप 1, उबाठा गटाने 1 तर गुहागर मधून मनसेने प्रथमच एका जागेवर विजय मिळवला. संगमेश्वर तालुक्यातील सात पैकी सर्वाधिक तीन जागा जिंकत उबाठा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. त्यापाठोपाठ शिवसेनेला 3 तर भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्येकी एक जागा मिळाली. राजापूर तालुक्यात 6 पैकी 6 आणि लांजा तालुक्यात 4 पैकी 4 जागांवर शिवसेनेने विजय मिळवत इतिहास रचला.

जिल्ह्यातील 9 पैकी 7 पंचायत समित्यांमध्ये शिवसेना आणि भाजप महायुतीने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. पंचायत समितीच्या 112 पैकी सर्वाधिक 74 जागा शिवसेनेने पटकावल्या. भाजपला 14, राष्ट्रवादीला 13, उबाठाला 11 तर इतर 1 असे पक्षीय बलाबल राहिले. रत्नागिरी, दापोली, खेड, मंडणगड, गुहागर, राजापूर आणि लांजा पंचायत समित्यांवर शिवसेना आणि भाजपाने बहुमतात सत्ता स्थापनेच्या दिशेने पाऊल उचलले आहे. तर चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात शिवसेना आणि भाजपाला राष्ट्रवादी अजित पवार गटाची मदत घेतल्या शिवाय सत्ता स्थापन करणे अवघड होणार आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page