
चिपळूण | प्रतिनिधी: कामथे घाटात केमिकलयुक्त पाणी असलेला टँकर नदीमध्ये सोडल्याच्या प्रकारावरून संतप्त झालेल्या कापसाळ व कामथे येथील ग्रामस्थांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेतृत्वाखाली चिपळूण येथील प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कार्यालयात सोमवारी धडक दिली. संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीन दिवसांत लेखी निर्णय न घेतल्यास कार्यालयाला टाळं ठोकण्यात येईल, असा तीव्र इशारा शिवसैनिकांनी दिला.
ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिल्यानुसार, मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या कामथे घाटात एका रासायनिक कंपनीने नदीत केमिकलयुक्त टँकर सोडला. यावर कारवाईसाठी आज ग्रामस्थ आणि शिवसेना पदाधिकारी यांनी प्रदूषण मंडळाचे अधिकारी श्री. कुलकर्णी व श्री. उत्कर्ष शिंगारे यांना घेरले. यावेळी श्री. कुलकर्णी यांनी “तीन दिवसांत साफयीस्ट कंपनीवर कठोर कारवाई करू”, असे आश्वासन दिले. मात्र, शिवसैनिकांनी आश्वासन नाकारून थेट कृतीची मागणी केली.
या प्रकरणातील टँकर मालकावरही गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस निरीक्षक श्री. फुलचंद मेंगडे यांची भेट घेण्यात आली. मेंगडे साहेबांनी “गुन्हा दाखल करणार आहोत,” अशी स्पष्ट भूमिका घेतली.
या आंदोलनात युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते, शिवसेना सचिव संभाजी खेडेकर, विभाग प्रमुख राम डिगे, उपशहरप्रमुख भैय्या कदम, संजय चांदे, पार्थ जागुष्टे, राहुल भोसले, संतोष रहाटे, सुभाष साळवी, संतोष जावळे, शैलेश कांबळे, प्रकाश दिघे, सचिन लटके, पांडुरंग व विठ्ठल हरेकर, लक्ष्मण जवरत, प्रवीण खेडेकर, सचिन चोरगे, ओंकार पंडित, अथर्व चव्हाण, मंदार निर्मळ, कृष्णा माटे, महेश गायकर आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या घेरावामुळे प्रशासन हलले असून, येत्या तीन दिवसांत प्रत्यक्ष कारवाई होते की नाही याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.