
मुंबई- दोन दिवसांच्या राजकीय घडामोडीनंतर शरद पवार यांनी अखेर आपला राजीनामा मागे घेतला आहे. त्यांनी यशवंत चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेत आपला हा निर्णय जाहीर केला आहे. पवारांच्या या पत्रकार परिषदेवर संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष लागलं होतं. त्यांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदच वातावरण आहे.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय मागे घेतला आहे. मी पक्षासाठी अजून जोमाने काम करेल, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नवं नेतृत्व घडवण्यावर माझा भर असेल, असेही ते म्हणाले. पक्षात उत्तराधिकारी निर्माण व्हायला हवा, असे सांगतानाच अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्याचे जाहीर करतो, असे पवार यांनी यावेळी सांगितले.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना शरद पवार म्हणाले कि, २ मे रोजी ‘लोक माझे सांगाती’ या माझ्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या अनावरण समारंभावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील सुमारे ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे, अशी माझी भुमिका होती.
ते म्हणाले कि, परंतू मी घेतलेल्या निर्णयाने जनमाणसांमध्ये तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व माझे सांगाती’ असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरीता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमुखाने, काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले. त्याचबरोबर देशभरातून व विशेषत: महाराष्ट्रातून विविध पक्षांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी आग्रही विनंती केली.
पवार पुढे म्हणाले कि, लोक माझे सांगाती’ हेच माझ्या प्रदीर्घ व समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो आहे. ते म्हणाले कि, माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनंत्या यांचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने ‘’मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे’ या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे.