
चिपळूण : चिपळूण येथे जमिनीच्या वादातून मित्राचा गळा चिरून निर्दयपणे खून केल्याचा आरोप असलेल्या ६ जणांना सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. २२०१५ मध्ये घडलेल्या या घटनेचा ८ वर्षानंतर न्यायालयाने निकाल दिला. एकाच गुन्ह्यात ६ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याची चिपळुणमधील ही पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे. निकालावेळी एक आरोपी गैरहजर राहिल्याने त्याला अटक करण्याचे आदेश यावेळी न्यायालयाने दिले.
चिपळूण सत्र न्यायाधीश एन. एस. मोमीन यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारी पक्षाकडून ऍड. प्रफुल्ल साळवी यांनी न्यायालयापुढे युक्तीवाद केला. जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींमध्ये दीपक वामन आंब्रे (४०, आवाशी), उमेश चंद्रसेन आंब्रे (३४), विक्रमसिंग भागसिंग मेश्राम ३४, मूळ मध्यप्रदेश, सध्या लोटे घरडा कॉलनी), सागर पाटील (३५, पटवर्धन लोटे), संदीप हरिश्चंद्र आंब्रे (४५), उमेश नारायण आंब्रे (४५, आवाशी खेड) यांचा समावेश आहे. खटल्यानंतर माहितीनुसार खेड तालुक्यातील आवाशी-देऊळवाडी येथील ओंकार तुकाराम कदम (२५) यांचा ३१ मे २०१५ रोजी खून झाल्याचे समोर आले होते. याची तक्र्रार त्याचा भाऊ समीर तुकाराम कदम याने चिपळूण पोलीस स्थानकात दिली होती. या खून प्रकरणी चिपळूणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी याचा तपास केला होता.
