संपदा जोगळेकर-कुलकर्णी: अभिनेत्री ते यशस्वी शेतकरीण; एक प्रेरणादायी प्रवास…

Spread the love

योगेश बांडागळे | चिपळूण: मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाने रसिकांचे मन जिंकणाऱ्या संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी अभिनय, लेखन, नृत्य आणि निवेदन या सर्वच क्षेत्रांमध्ये ठसा उमटविल्यानंतर आता गेली १६ वर्षे सेंद्रिय शेती आणि कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग बनण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस या छोटेखानी गावात त्यांनी पती राहुल कुलकर्णी यांच्या सहकार्याने ‘आनंदाचं शेत’ या नावाने सेंद्रिय शेती आणि ‘होम स्टे’ प्रकल्प सुरू केला आहे.

वयाच्या चाळीशीनंतर काहीतरी वेगळं करण्याचा निर्धार त्यांनी केला आणि शहरातील आरामदायक जीवनशैलीला अलविदा करून, ग्रामीण संस्कृतीत खोलवर रुजायचं ठरवलं. राहुल कुलकर्णी हे जाहिरात क्षेत्रातील उच्च पदावरील नोकरी सोडून पत्नीच्या या निर्णयात सहभागी झाले. ओसाड, खडकाळ जमिनीपासून सुरुवात करत, त्यांनी विहीर खोदली, टुमदार शेतघर उभारले आणि सेंद्रिय शेतीचा ध्यास घेतला. पाण्याचा पुनर्वापर, मिश्र पिके, नैसर्गिक खतांचा उपयोग, स्थानिक बी-बियाणांचे संवर्धन अशा विविध प्रयोगांतून त्यांनी शाश्वत शेतीचा आदर्श तयार केला आहे.

आज त्यांच्या ‘आनंदाचं शेत’वर केवळ सेंद्रिय उत्पादन होत नाही, तर शहरी लोकांसाठी ग्रामीण वास्तव अनुभवण्यासाठी ‘होम स्टे’चीही सुविधा आहे. त्यांच्या अनुभवांवर आधारित कार्यशाळांमध्ये अनेक शेतकरी आणि नवउद्योजक मार्गदर्शनासाठी येतात. त्यांना शेतीतून केवळ समाधानच नाही, तर स्थिर अर्थार्जनाचा मार्गही मिळाला आहे.

संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांचा कलाक्षेत्रातील प्रवासही तितकाच समृद्ध आहे. ‘शर्यत’, ‘उदय’ या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. ‘ऑल द बेस्ट’ नाटक, तसेच ‘टक धिना धिन’, ‘शुभेच्छा शुभमंगल सावधान’ सारख्या कार्यक्रमांच्या निवेदिकाही म्हणून रसिकांनी त्यांना पाहिले. त्यांनी कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेतले असून, नाटक व चित्रपट दिग्दर्शनही केले आहे. ‘बाबाजींची शाळा’ आणि ‘संगत सोबत’ हे त्यांचे दिग्दर्शित कलाप्रयोग विशेष गाजले.

मराठी विषयात एम.ए. आणि पीएच.डी. पदवीधारक असलेल्या संपदा यांनी लेखन क्षेत्रातही विशेष योगदान दिले आहे. त्या स्तंभलेखिका असून, त्यांची काही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. अभिनयातील कामगिरीसाठी त्यांना अल्फा गौरव, ठाणे गौरव, माता सन्मान आणि कलांगण असे विविध पुरस्कार मिळाले आहेत.

कलाक्षेत्र ते कृषीक्षेत्र : एक परिपूर्ण परिवर्तन…

संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांचा प्रवास केवळ व्यावसायिक यशाचाच नाही, तर समर्पण, मेहनत आणि बदल स्वीकारण्याच्या धाडसाचाही आहे. त्यांनी दाखवलेली मार्गक्रमणा आज अनेकांना प्रेरणा देणारी आहे. “शहरातून गावाकडे” ही संकल्पना केवळ भाषणापुरती न ठेवता, कृतीत उतरवून त्यांनी एक वेगळी जीवनदृष्टी साकारली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page