
कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या काही दिवसानंतर आता रोहितनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यामुळं अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
रोहितनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
रोहितनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं अवघ्या काही दिवसांआधी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रोहितच्या कसोटी निवृत्तीनंतर अनेक स्तरातून त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत. तसंच आजी माजी खेळाडूंनी सोशल मीडियावर पोस्ट करत रोहितबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला. त्यातच आता निवृत्तीच्या काही दिवसानंतर आता रोहितनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी रोहितसोबतचे काही फोटो पोस्ट करुन याबाबतची माहिती दिली. फडणवीस यांनी रोहितला कसोटी निवृत्तीनंतरच्या उर्वरित प्रवासासाठी शुभेच्छाही दिल्या. विशेष म्हणजे रोहित शर्माची मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जाण्याची 11 महिन्यांमधील दुसरी वेळ ठरली. यामुळं क्रिकेटला अलविदा केल्यावर रोहित राजकारणात तर जाणार नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी पोस्ट करत दिली माहिती….
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहितसोबत अनेक विषयांवर संवाद साधला. तसंच रोहितला निवृत्तीनंतर पुढील प्रवासासाठी शुभेच्छाही दिल्या. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘वर्षा माझ्या अधिकृत निवासस्थानी भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माचं स्वागत करणं, त्यांना भेटणं आणि त्यांच्याशी संवाद साधून खूप छान वाटलं. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याबद्दल आणि त्यांच्या प्रवासाच्या पुढील टप्प्यात यश मिळावं, यासाठी मी त्यांना शुभेच्छा दिल्या.’
11 महिन्यांत दुसऱ्यांदा ‘वर्षा’वर….
टीम इंडियानं 29 जून 2024 रोजी रोहितच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी 20 वर्ल्ड कप उंचावला होता. त्यानंतर टीम इंडियाचा भारतात आणि मुंबईत जोरदार स्वागत करण्यात आलं होतं. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 जुलै रोजी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या वर्ल्ड कप विजेता संघातील खेळाडूंचं वर्षावर स्वागत केलं होतं. अशा प्रकारे रोहितची ही वर्षावर जाण्याची गेल्या 11 महिन्यांमधील दुसरी वेळ ठरली.
*भारतासाठी एकूण 67 कसोटी सामने…*
रोहित शर्मानं 2013 मध्ये भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं त्याच्या पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये शतकंही केली. परदेश दौऱ्यांवरील त्याची कामगिरी कसोटी क्रिकेटइतकी प्रभावी राहिलेली नाही. याच कारणास्तव, तो संघातून आत-बाहेर जात राहिला. आतापर्यंत त्यानं भारतीय संघासाठी 67 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 4301 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्यानं 12 शतकं आणि 18 अर्धशतकं झळकावली आहेत.