
*रत्नागिरी:* शहराजवळील भाटये येथील रत्नसागर रिसॉर्ट प्रकरणी आता जप्ती स्थगितीसाठी जिल्हा न्यायालयाकडून २५ जून पर्यंत मुदतवाढ मिळाली होती. आज या प्रकरणी जिल्हा न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. जप्ती स्थगितीला आता पुन्हा मुदतवाढ मिळाली असून ती २३ जुलैला न्यायालयात सुनावणी होणार आहे.
भाट्ये समुद्रकिनाऱ्यावरील रत्नसागर रिसॉर्ट मे २०२१ मध्ये जिल्हा प्रशासनाकडून बंद करण्यात आले होते. मुदतीआधीच रिसॉर्ट बंद केल्याने संबधित मालक प्रतापसिंह सावंत यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. अचानक रिसॉर्ट बंद झाल्याने सावंत यांची ९ कोटी २५ लाख रुपये इतकी नुकसान भरपाई जिल्हा प्रशासनाने द्यावी असे आदेश जिल्हा न्यायालयाकडून देण्यात आल्याचे सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. ४ एप्रिल (शुक्रवारी) सकाळी साडे अकराच्या सुमारास संबंधित प्रकरणाचे आदेश घेवून कोर्टाचे दोन कर्मचारी व तक्रारदार सावंत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.
या आदेशासंदर्भात जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानभरपाई द्यावी अन्यथा त्यांच्या कार्यालयातील सामान जप्त करण्याच्या आदेशानुसार कारवाईला सुरवात केली. या कारवाईत जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातील खुर्च्या आणि संगणक बाहेर काढले. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई कऱण्यात आली संबंधित कारावाई संदर्भात तत्काळ स्थगिती मिळविण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले होते. ही कार्यवाही पुढे १६ एप्रिल पर्यत स्थगित करण्यात आली होता. जिल्हा न्यायालयाकडून २५ जून पर्यत स्थगितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पुन्हा २३ जुलै पर्यंत स्थगितीसाठी मुदतवाढ दिली आहे.