२०२४ ला रत्नागिरी-सिंधुदुर्गचा खासदार हा महायुतीचाच असेल…

Spread the love

भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांनी देवरूख येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला विश्वास

देवरूख- तीन राज्यांच्या निवडणुकांचे निकाल भाजपच्या बाजूने लागल्यामुळे भाजपचे नेते, कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अगामी निवडणुकीसाठी जी सेमिफायनल होती ती भाजपने जिंकली आहे. आणि या सेमिफायनलनेच २०२४ च्या फायनलचा निर्णय निश्चित केला आहे. त्यामुळे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील भाजपचे कार्यकर्ते अगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागले आहेत. २०२४ ला रत्नागिरी- सिंधुदुर्गचा खासदार हा महायुतीचाच असेल, असा विश्वास भाजपचे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुक प्रमुख प्रमोद जठार यांनी आज गुरूवारी देवरूख येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.

लोकसभा प्रवास योजनेंतर्गत संगमेश्वर तालुक्यातील २ दिवसीय प्रवास आज गुरूवारी संपला. यादरम्यान प्रमोद जठार यांनी भाजपच्या वतीने देवरूख येथील कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत बोलताना प्रमोद जठार म्हणाले कि, रिफायनरी हा विषय समोर आणण्यासाठी त्यासंदर्भात आग्रही भुमिका आपण मांडली. यातून रोजगारनिर्मिती होईल हा माझा विश्वास आहे. याशिवाय जवळपास ६ हजार बायप्रॉडक्ट्स तयार करण्याची क्षमता रिफायनरीमध्ये आहे. अनेक नवे उद्योग कोकणात आणून कोकणाला खऱ्या अर्थाने समृद्ध करण्यासाठी केंद्रात मोदींजींचे नेतृत्व असणे गरजेचे आहेच सोबतच केंद्र सरकारची धोरणे, योजना कोकणातील जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी भाजपाचा खासदार संसदेत जाणे काळाची गरज आहे. आणि यावेळी कोकणचा जनादेश भाजपाला मिळणार याबाबत आमच्या मनात तिळमात्र शंका नाही, असा आशावाद श्री. जठार यांनी व्यक्त केला.

रत्नागिरी जिल्ह्यातील संंगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर व चिपळूण तालुक्यातील परशुराम या दोन पर्यटनस्थळांच्या ठिकाणी रोपवेची निर्मिती करण्यात यावी यासाठी आम्ही सरकारला प्रस्ताव पाठवला आहे, असेही प्रमोद जठार यांनी यावेळी सांगितले. कोकणवासियांपुढे आज अनेक समस्या आहेत. मागील ६० वर्षे या समस्यांमध्ये सातत्याने वाढ झाली. मात्र आज जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांच्या समस्यांवर उत्तर देण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता संसदेत खासदार म्हणून जाण्यासाठी सज्ज झाला आहे. आपल्या खासदारकीबाबत ते म्हणाले कि, मी पार्टीचा कार्यकर्ता आहे. वरिष्ठांनी मला लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून दिलेले दायित्व पूर्ण क्षमतेने पार पाडण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. अशात सध्या मी फारसा त्याबाबत विचार करण्यात वेळ घालवत नाही.

मात्र एक नक्की पार्टीने संधी दिली तर मी नक्की लढेन आणि माझा सर्व कार्यकर्त्यांवर असलेला विश्वास मला सांगतोय की यावेळी मी लढलो तर नक्की जिंकेन. चिपळूण-संगमेश्वर विधानसभेत प्रमोद अधटराव आमचे नेते आहेत. आत्ता आमचे लक्ष लोकसभेवर असल्याने अन्य कोणतेही विषय आमच्यासाठी महत्त्वाचे नाहीत. फक्त एकच गोष्ट, कोकणचा विकास होण्यासाठी जनतेने भाजपाला एक संधी द्यावी, असे प्रमोद जठार यांनी बोलताना म्हटले. या पत्रकार परिषदेप्रसंगी भाजपचे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव, रत्नागिरी (द.) जिल्हा सरचिटणीस सौ. संगीता जाधव, संगमेश्वर (द.) तालुकाध्यक्ष रुपेश कदम, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये, देवरूख शहराध्यक्ष सुशांत मुळ्ये आदिंसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page