
*संगमेश्वर: अर्चिता कोकाटे/ नावडी –* संगमेश्वर येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प देवरुख संगमेश्वर अंतर्गत रामपेठ अंगणवाडी तर्फे परसात नावडीचा मा. सरपंच प्रज्ञा कोळवणकर यांच्या शुभहस्ते वृक्षरोपण करण्यात आले यावेळी मा. सरपंच प्रज्ञा कोळवणकर व ग्रामपंचायत सदस्या प्रतीक्षा शेरे यांचे अंगणवाडीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
पर्यावरणाचा समतोल राखणे, मानवाला प्राणवायूची गरज, फळे, सावली, फुले तसेच आरोग्याच्या दृष्टीने मानवी जीवनात वनस्पतींचे आरोग्यासाठी उपयोग याविषयी सेविका पल्लवी शेरे यांनी माहिती दिली. अंगणवाडीची बालके, पालक यावेळी उपस्थित होते.


वृक्षरोपण ही काळाची गरज आहे.आज महामार्गामुळे अनेक वृक्षांची तोड झालेली आहे. त्यामुळे जमिनीत पाणी मुरवण्याची क्षमता कमी होत आहे. वृक्ष हे जसे ऑक्सिजन निर्माण करू शकतात तस जमिनीमध्ये पाणी धरून ठेवतात. पाणी जिरवून ठेवण्याची क्षमता ही मोठ्या झाडांमध्ये असते.पिंपळ,वड, आंबा, नारळ यांची मुळे प्रचंड प्रमाणात पाणी धरून ठेवू शकतात. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी प्रचंड प्रमाणात पाऊस पडलेला आहे पण झाडांची संख्या कमी असल्यामुळे सर्व पाणी हे वाहून जाऊन नदी आणि त्यानंतर समुद्राला मिळालेले आहे. फार कमी प्रमाणामध्ये पाणी जमिनीत आहे ज्याचा उपयोग सध्याच्या वाढत्या लोकसंख्येनुसार फारच कमी होणार आहे आणि भविष्यामध्ये पाण्याचा तुटवडा प्रचंड प्रमाणात जाणवणार आहे. त्यासाठी वृक्षरोपण करणे आवश्यक आहे. मान्यवरांचे आभार मदतनीस शीतल अंब्रे यांनी मानले.