
मुंबई :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. मनसेनं राज ठाकरेंची एक जुनी पोस्ट ट्विट करत “गांधीजींसारखा दुसरा कोणी होणे नाही”, अशा शब्दांत त्यांना अभिवादन केलं आहे.
मनसेनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये काय?मनसे अधिकृत या ट्विटर हँडलवरुन राज ठाकरेंची ही जुनी पोस्ट शेअर करण्यात आली आहे. आज गांधीजींचा जन्मदिवस नाही किंवा स्मृतीदिनही नाही. पण तरीही गांधीजी सध्या चर्चेत आहेत ते म्हणजे संभाजी भिडेंच्या आक्षेपार्ह विधानामुळं. यापार्श्वभूमीवरच मनसेनं ही पोस्ट शेअर केल्यानं चर्चेत आहे. पोस्टमध्ये लिहिलंय… राज ठाकरेंनी २ ऑक्टोबर २०२२ला ‘महात्मा गांधीं’वर लिहिलेली एक अप्रतिम अभिवादनपर पोस्ट.
महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असं नेतृत्व असेल की, जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेलं तेही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसताना. गांधींजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की, फक्त भारतच नव्हे तर जवळपास तीन खंडातील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण जे गांधीजींना जमलं ते पुढे जवळजवळ कोणालाच जमलं नाही.
विशिष्ट राजकीय-सामाजिक परिस्थितीत प्रबळ वाटणारे नेते आले, कमालीचे लोकप्रिय झाले आणि पुढे काही वर्षातच मागे पडलेले दिसले आहेत. दुसरं महायुद्ध जिंकल्यावर चर्चिल, जगाला फॅसिझमच्या विळख्यातून सोडवणारा तारणहार म्हणून पुढे आले, पण त्यांची लोकप्रियता पुढे झपाट्याने ओसरली. ह्याला कारण चर्चिल ह्यांचं योगदान एका विशिष्ट परिस्थितीला पूरक होतं, ते चिरकाल टिकावं असं नव्हतं. पण गांधीजींचं तत्वज्ञान व्यापक होतं.
शृंखला मग त्या अज्ञानाच्या असोत, की गुलामगिरीच्या, वसाहतवादाच्या की जातींच्या, त्या शृंखलांनी कुठल्याही माणसाला बांधून ठेवण्याचा अधिकार कोणालाच नाही. कारण सगळी माणसं ही मुळात समान आहेत. इतकं सोपं तत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. हे खूप कठीण आणि दुर्मिळ आहे, म्हणूनच गांधीजींसारखा बहुदा दुसरं कोणी होणे नाही. गांधीजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.
संभाजी भिडेंनी काय म्हटलं होतं ?
अमरावतीच्या बडनेर इथं झालेल्या कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडेंनी महात्मा गांधींचे वडील करमचंद गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. करमचंद गांधी हे मोहनदास अर्थात गांधीजींचे खरे वडील नसून ते एका मुस्लीम जमीनदाराचे पुत्र होते, असं वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं होतं. इतकेच नाही तर मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकानं केल्याचा दावा देखील भिडेंनी केला होता. दरम्यान, या विधानामुळं मोठं वादंग निर्माण झालं असून काँग्रेस नेते आक्रमक झाले असून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. भिडेंविरोधात अमरावतीत गुन्हा देखील दाखल झाला आहे.