
पुणे- ग्रामीण भागातील सर्व यंत्रणा महावितरणच्या मर्जीने चालते कारण की आठ ते बारा तास ग्रामीण भागातील बत्ती गुल असते. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी,आणि कामगार वर्गासह महिलांची पाण्यासाठी वणवण होत असते. सतत लाईट जात असल्याने अनेक ग्रामीण भागातील यंत्रणा ठप्प होते. मात्र पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पुसाणे गाव हे या त्रासापासून मुक्त होणार आहे.
राज्यातील पहिलेच मावळ तालुक्यातील गाव आहे जे आता फक्त सोलार सिस्टीमवर चालणार आहे. एका नामांकित विदेशी कंपनीने तालुक्यातील पुसाणे गावाची निवड करून भव्यदिव्य सोलर सिस्टीम प्रकल्प उभा केला आहे. त्यामुळे आता गावातील लाईट २४ तास सुरू राहणार आहे. या सोलर सिस्टीममुळे रस्त्यावरील लाईट, ग्रामपंचायत कार्यालय, मंदिर, शाळा, पिण्याचे पाणी उपसाकेंद्र करण्यासाठी लागणाऱ्या मोटारी चालणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी कोसो दूर जाण्याची गरज भासणार नाही.
या सोलार सिस्टीममुळे 24 तास लाईट आणि पाणी गावात राहणार आहे. दीड हजार लोकसंख्या असलेल्या या गावाने 20 लाख खर्च केलेत तर विदेशी कंपनी एमटीयू आणि रोल्स रॉयल्स या कंपनीने कोट्यवधी रुपयांचा खर्च या सोलर सिस्टीम प्रकल्पावर केला आहे. केवळ सोलार सिस्टीमच नव्हे तर बॅटरी आणि जनरेटर बॅकअप देखील या प्रकल्पात देण्यात आला आहे. सिस्टीमवर आता ग्रामस्थ लोड शेडिंगच्या त्रासातून मुक्त होणार आहेत. या सोलार सिस्टीम प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना शेतात पाणी सोडणे सोप्पे होणार तर विद्यार्थी अभ्यासापासून वंचित राहणार नाही. तर महिलांची पाण्याची वणवण थांबणार असल्याने पुसाणे गावाचं नंदनवन होणार असल्याने ग्रामस्थांनमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.