
महामार्ग ठेकेदाराने केलेल्या निकृष्ठ कामाची निसर्गाने केली पोलखोल
एजाज पटेल/संगमेश्वर – गेले काही दिवस सुरु असलेल्या पावसामुळे मुंबई -गोवा राष्ट्रीय माहार्गावरील आंबेड खुर्द येथे महामार्ग लगत असलेल्या दरडी वरील घरांना दरड कोसळून नुकसान होऊ नये या करिता उभारण्यात आलेली आर. सी. सी सरक्षण भिंतच जमीनदोस्त झाल्याने ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट कामाचा निसर्गाने अक्षरशः पंचनामाच केला आहे. तर दरड कोसळून सरक्षण भिंत जमीनदोस्त झाल्याने येथील नासिर युनूस खान आणि मुनीरा अन्वर खान यांच्या घराला धोका निर्माण झाला असून समोर चे दृश्य पाहता हे घर केव्हा ही कोसळेल हे नाकारून चालणार नाही.
आंबेड खुर्द येथे महामार्गा लगतच्या उंच भागावरील लोकवस्ती जवळील दरड कोसळून धोका होऊ नये याकरिता ठेकेदाराने बांधलेली नासिर खान आणि मुनीरा खान यांच्या घरालगतची भली मोठी असलेली सरक्षण भिंत भिंत दरडी बरोबर धाड-धाड करत जमीनदोस्त झाल्याने खान यांच्या घरांना भविष्यात धोका आहे हे सांगण्यास कोणा ज्योतिषची गरज नाही. ह्या घराच्या अगदी काही फुटा पर्यंतच आता जागा शिल्लक राहिली असल्याने भूस्खलन झाल्यास ही घरे जमीनदोस्त होण्यास वेळच लागणार नाही.
तर येथील कबरस्तान जमीन तसेच मशीद व अन्य घरांना सुद्धा भविष्यात फार मोठा धोका होईल हे सुद्धा नाकारता येणार नसून तसे घडल्यास आर्थिक हानी बरोबर भरून न येणारी जीवित हानी सुद्धा होऊ शकेल या भीतीत येथील लोक असून दुर्घटना घडल्या नंतर वेळ गेलेली असेल तरी त्या पूर्वी याची दखल लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाने तेवढ्याच गांभीर्याने घेणे अत्यावश्यक आहे.
तसेच दर्जाहीन कामामुळेच सरक्षण भिंतीचे तुकडे होऊन ती मातीच्या प्रवाहाबरोबर जमीनदोस्त झाल्याची सर्वत्र ओरड केली जात असून ठेदाराने केलेल्या कामाच्या दर्जाची पाहणी करून चौकशी करण्याची चर्चाही तेवढ्याच जोरात सुरु आहे.