बूथ सशक्तीकरण आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आगामी दौऱ्यानिमित्त देवरुख येथे भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न.

Spread the love

प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव यांसह जिल्हा कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित.

जनशक्तीचा दबाव न्यूज | देवरुख | सप्टेंबर २९, २०२३.

‘महाविजय २०२४’च्या अनुषंगाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तयारी मोठ्या प्रमाणात सुरु झाली असून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाचा उमेदवार लढवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. अशात कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून मेळावे आणि अभ्यासवर्ग आयोजित करण्यात येत आहेत. चिपळूण-संगमेश्वर विधानसभेतून लोकसभा निवडणुकीत भाजपला मताधिक्य मिळावे यासाठी बूथ सशक्तीकरण कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. यासाठी आज झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. अतुल काळसेकर, कोकण विभागाचे संघटन मंत्री श्री. शैलेंद्र दळवी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख व माजी आमदार श्री. प्रमोद जठार, रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव यांसह जिल्हा कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. प्रमोद अधटराव यांनी आपल्या प्रस्तावनेच्या माध्यमातून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. प्रदेशाध्यक्ष आम. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आगामी दौऱ्याचे महत्त्व विषद केले. यानंतर प्रमुख कार्यकर्त्यांची ओळख पदाधिकाऱ्यांनी करून घेतली. संघटनमंत्री श्री. दळवी म्हणाले, “कार्यकर्त्यांनी आता सजगपणे कार्य करावे. आपण दिवसभरात केलेल्या पक्षकार्याची नोंद आपल्या नोंदवहीत अचूकपणे करावी. पक्ष आपल्या कामांचे मूल्यमापन सातत्याने करत असल्याने केलेल्या कामांची नोंद असणे अनिवार्य आहे.” श्री. अतुल काळसेकर म्हणाले, “मतदार यादी हा राजकीय कार्यकर्त्याचा सर्वांत मोठा आधार आहे. त्यामुळे या यादीचा संपूर्ण अभ्यास आपला झालेला असलाच पाहिजे. बावनकुळे साहेबांचा दौरा ही एक संधी आहे याचा उचित लाभ उचलण्याचा कार्यकर्त्यांनी आवर्जून प्रयत्न करणे गरजेचे आहे. बावनकुळे साहेबांच्या दौऱ्यानंतर आपल्या मनात लोकसभा निवडणूक लढवण्याविषयी कोणताही किंतु-परंतु असणार नाही ही जबाबदारी आपली आहे.”

लोकसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद जठार खास आपल्या शैलीत मार्गदर्शन करताना म्हणाले, “आपण हा यज्ञ मा. मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी करत आहोत यापेक्षा राष्ट्राच्या निरंतर कल्याणासाठी करत आहोत ही गोष्ट मनाशी पक्की करायला हवी. कोणत्यातरी निवडणुकीसाठी नाही तर भारतवर्षाच्या समृद्ध वारशाला जतन करण्यासाठी, पुढील पिढ्यांना हा वारसा सुपूर्द करण्यासाठी आपला संघर्ष आहे. ‘लोकमान्य’ टिळकांनंतर आपल्याला लाभलेले ‘जगन्मान्य’ नेतृत्व देशाला दिशा दाखवण्यात यशस्वी ठरले आहे. ३७० गेले… राममंदिर आले, तीन तलाक गेला… ३३% आरक्षण महिलांना मिळाले. ‘वसुधैव कुटुंबकम’ हा प्राचीन भारतीय संदेश एक राष्ट्रीय संकल्पना म्हणून पुढे घेऊन येण्यात यशस्वी ठरलेले मा. मोदीजी याच संदेशाला जगभर प्रसृत करून एकत्र आणतात ही गोष्ट अभिमानास्पद आहे. आज पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रांतील नागरिक मोदीजींसारख्या नेतृत्त्वाची अपेक्षा ठेऊन आहेत. आपल्याला लाभलेले नेतृत्व प्रगल्भ आणि मेहनती आहे. हाच आदर्श आपल्याला घ्यायचा आहे. आपण मोदीजींचे सरदार आहोत. त्यामुळे ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’ म्हणत मुक्त संचार करायचा आहे. आणि माझा विश्वास आहे आपण सर्वजण ‘शतप्रतिशत भाजपा’साठी कटिबद्ध आहात.

जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत म्हणाले, “मा. बावनकुळे साहेब हे आपल्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी येणार आहेत. त्यांच्यासमोर येताना आपण जबाबदार कार्यकर्ते आहोत याचे भान राखून त्या तयारीत आलो पाहिजे. आपल्या सर्व योजनांचे श्रेय केवळ आपले लोकप्रतिनिधी नसल्याने आपल्याला घेता येत नाही त्यामुळे बावनकुळे साहेब आपल्याकडे येणे ही एक संधी आहे. यामुळे आपण सर्वांनी येणाऱ्या दौऱ्याला सकारात्मक प्रतिसाद देत लोकसभा विजयाचा विश्वास आपल्या नेतृत्त्वाला देण्यासाठी ८ ऑक्टोबरला मोठ्या संख्येने उपस्थित राहूया.”

यावेळी भारतीय जनता पार्टी रत्नागिरी (उत्तर) चे उपाध्यक्ष श्री. रामदास राणे, जिल्हा सरचिटणीस श्री. सतेज नलावडे, जिल्हा सरचिटणीस श्री. अमित केतकर, जिल्हा सरचिटणीस सौ. संगीता जाधव, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. सुजाता साळवी, जिल्हा चिटणीस श्री. राकेश जाधव, जिल्हा चिटणीस सौ. कोमल रहाटे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. सुधीर यशवंतराव, श्री. महेश (बावा) जड्यार, सौ. स्वाती राजवाडे, श्री. श्रीकांत भागवत, जिल्हा कार्यकारिणी विशेष निमंत्रित सदस्या सौ. रश्मीताई कदम, जिल्हा ओबीसी मोर्चा संयोजक श्री. अभिजीत शेट्ये, जिल्हा सोशल मिडिया संयोजक श्री. अमोल गायकर, संगमेश्वर (दक्षिण) तालुकाध्यक्ष श्री. रूपेश कदम, संगमेश्वर (उत्तर) तालुकाध्यक्ष श्री. विनोद म्हस्के आदी नवनियुक्त प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. सुशांत मुळ्ये यांनी स्फुर्तीगान गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा पदवीधर प्रकोष्ठ संयोजक श्री. निलेश भुरवणे यांनी केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page