
*नवी दिल्ली :* PM Narendra Modi पाकिस्तानच्या विनंतीवरून भारताने सध्या कारवाई स्थगित केली असली, तरी ती कायमस्वरूपी थांबवलेली नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. “पाकिस्तान जर पुन्हा आगळीक करेल तर भारत चोख आणि निर्णायक प्रत्युत्तर देईल. आम्ही आमच्या अटींवर आणि आमच्या पद्धतीनेच उत्तर देणार, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री ८ वाजता देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पाकिस्तान आणि दहशतवादावर कठोर भूमिका मांडली. ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, “ज्यांनी आपल्या माता-भगिनींच्या कपाळावरचं सिंदूर पुसलं, त्यांचा पूर्ण नाश करण्यात आला आहे. आमच्या कारवाईत १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला.”
मोदींनी स्पष्ट केलं की, भारत कोणत्याही अण्वस्त्रांच्या धमक्यांना भीक घालणार नाही. “दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारांना आम्ही स्वतंत्र घटक मानणार नाही. ऑपरेशन सिंदूर दरम्यान जेव्हा पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजर होते, तेव्हा संपूर्ण जगाने पाकिस्तानचा खरा चेहरा पाहिला.
पंतप्रधानांनी भारतीय हवाई दल, लष्कर आणि नौदलाच्या यशस्वी कारवाईचे कौतुक करत सांगितले की, “पाकिस्तानच्या अभिमानाचे हवाई तळ उद्ध्वस्त करण्यात आले. त्यांचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे भारताच्या हवाई संरक्षण व्यवस्थेपुढे निष्प्रभ ठरली. तीन दिवसांत पाकिस्तानला जबरदस्त नुकसान सोसावं लागलं, त्यामुळे त्यांनीच संपर्क साधून संघर्षविरामाची मागणी केली. ऑपरेशन सिंदूरनं भारताच्या युद्धनीतीत नवा अध्याय जोडला आहे. आता हे एक नवीन नॉर्मल आहे. भारताला जर परत हल्ला झाला, तर उत्तरही वेगळं आणि परिणामकारक असेल. ऑपरेशन सिंदूरनं ‘मेड इन इंडिया’ शस्त्रांची ताकदही जगाला दाखवून दिली.
पाकिस्तानने भारतातील गुरुद्वारे, घरे, मंदिरे, शाळा आणि लष्करी ठिकाणे लक्ष्य केल्याचं सांगताना मोदी म्हणाले की, “पाकिस्तान सीमेवर हल्ला करायला सज्ज होता, पण भारताने त्याच्या छातीत घाव घातला. शांतीचा मार्ग ताकदीतूनच शक्य असल्याचे सांगताना मोदी म्हणाले, “भगवान बुद्धांनी शांतीचा संदेश दिला, पण शांती टिकवण्यासाठी सामर्थ्य आवश्यक आहे. भारत शक्तिशाली असेल, तरच त्याच्या नागरिकांना सुरक्षित, शांत आणि समृद्ध जीवन मिळू शकते.
भविष्यात पाकिस्तानने कोणती भूमिका घेतली, त्यावरच भारताचे उत्तर अवलंबून असेल, असेही त्यांनी बजावले. “दहशतवाद आणि चर्चा एकत्र चालू शकत नाहीत, दहशतवाद आणि व्यापारही नाही. पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही,” असं ते म्हणाले. जर भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही चर्चा झाली, तर ती केवळ दहशतवाद किंवा पीओकेवरच असेल.