
*दापोली*: तालुक्यातील जालगाव येथील पर्यावरण प्रेमी प्रशांत परांजपे यांना पर्यावरण क्षेत्रातील शाश्वत विकासाबद्दल कोलंबो विद्यापीठाची ची मानद डॉक्टरेट पदवी नुकतीच पुणे येथे विशेष समारंभात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.
श्री. परांजपे हे २००१ पासून पर्यावरण क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. केल्याने होत आहे रे या समर्थ वाणी प्रमाणे त्यांनी पर्यावरण संवर्धनामध्ये विविध उपक्रम सातत्याने सुरू ठेवले आहेत .
काही नवीन संकल्पनांच्या अनुषंगाने परांजपे यांनी यशोगाथाही निर्माण केल्या आहेत. त्यांनी जलसंवर्धन आणि वृक्ष संवर्धन या विषयात काम करताना एक रोप दोन खड्डे , मातीविरहित मचाण शेती, पालापाचोळा न जाळता खत निर्मिती असे यशस्वी प्रयोग केले आहेत.
कचरा विषयात काम करताना इ वेस्ट पासून स्वागत कक्षाची निर्मिती, प्लास्टीक बाटल्यांपासून हँगिंग, बुके, बाकडी व स्टूल आणि फुटपाथची निर्मिती, इको फ्रेंडली गुढी ची निर्मिती ,सागराच्या पाण्यापासून हरितक्रांती, सर्व प्रकारच्या कचऱ्याच्या विघटनाला सशक्त मार्ग, ओल्या कचऱ्या पासून घरच्या घरी खत निर्मिती, वृक्ष वाढदिवस,वणवा मुक्त गाव योजनेची संकल्पना,गावात पाझर खड्डे आणि जलतरा निर्मितीतून लाखो लीटर पाणी जिरवणे , पर्यावरण पूरक गणेशमूर्ती निर्मिती अशा अनेक यशस्वी संकल्पना साकारल्या आहेत.
श्री.परांजपे यांचे निवेदिता प्रतिष्ठान या त्यांच्या पर्यावरण विषयी संस्थेच्या माध्यमातून राज्यातील अनेक जिल्ह्यात काम सुरू आहे. ते रत्नागिरी जिल्हा परिषदेत जलसंपदा विभागा मध्ये जलप्रेमी या पदावरून काम करित आहेत .त्याचप्रमाणे जलशक्ती अभियान आणि पाणी व स्वच्छता मिशन या विभागातून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करण्याचे कार्य २०१२ पासून सातत्याने करित आहेत. पर्यावरण विषयी संस्था फेडरेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेचे प्रमुख समन्वयक म्हणून गेली अनेक वर्ष काम करित आहेत .पर्यावरण विषयी “सुगंध वसुंधरा रक्षणाचा” हे त्यांचे पुस्तक प्रकाशित आहे.अनेक मासिके व दैनिकांमधून पर्यावरण संदर्भात सातत्याने स्तंभलेखन , लेखमालिकेच्या माध्यमातून जनप्रबोधन सुरू असते. ग्रामपंचायत जालगाव येथे माझी वसुंधरा अभियानाचे प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत. आतपर्यंत त्यांना अनेक राज्य व जिल्हास्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
प्रशांत परांजपे यांच्या पर्यावरण कार्याची दखल घेऊनच कोलंबो विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी दिली.