
कोल्हापूर- पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या राजारामपुरी इथं एका महिलेला साखळदंडाने बांधून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला असून हा प्रकार कोणी आणि कशासाठी केला? याबाबत तुर्तास माहिती मिळालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर पोलिसांचे क्राईम ब्रांच आणि राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महिलेला साखळदंडातून मुक्त केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरातील राजापुरी येथील सायबर चौक परिसरात असलेल्या दौलतनगर भागातील ही घटना आहे. या महिलेला तिच्या कुटुंबातील सदस्यांनी साखळदंडाने बांधून ठेवलं होतं. ही माहिती काही स्थानिकांनी पोलिसांना कळवली होती. पोलिसांनी आज अचानक त्या घरावर धाड टाकून महिलेची मुक्तता केली . ही महिला खूपच अशक्त झाली आहे. पीडित महिलेच्या गळ्याला आणि पायाला जाड साखळीने बांधून ठेवत त्याला मोठं कुलूप लावण्यात आले होते.
पोलिसांनी कुलूप खोलणाऱ्या व्यक्तीला बोलावून महिलेला सांखळदडांतून मुक्त केले आहे. या महिलेला का बांधून ठेवलं याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, त्यादृष्टीने पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे. मात्र, पोलिसांनी महिलेची सुटका केल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळतात शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले असून संबंधित महिलेची सुटका करुन आरोपींवर कारवाईची मागणी त्यांच्याकडून होत आहे.