पाकिस्तानची झोप उडवणार ‘चिनाब पूल’, पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; वैशिष्ट्ये वाचून डोळे विस्फारतील…

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चिनाब नदी पुलाचे उद्धाटन करण्यात येत आहे. हा जम्मू काश्मीरमधील पुल जगातील सर्वात उंच रेल्वे पुल असणार आहे.

जम्मू – काश्मीर : भारत रोज नवनवीन विकासाचे टप्पे पार करत आहेत. यामधील एक महत्त्वकांशी प्रकल्प समृद्धी महामार्गाचे काल (दि.05) उद्घाटन करण्यात आले आहे. तर आज चिनाब पूलाचे उद्घाटन केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन होणार आहे. संपूर्ण देशासह जगभरामध्ये या पूलाची चर्चा रंगली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या या चिनाब पूलाने शेजारील देश पाकिस्तानला धडकी भरवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जम्मू-काश्मीर दौऱ्यावर जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर त्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेमध्ये देखील मोठी वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या हस्ते चिनाब पूल, अंजी पूल यांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल अंजी पूल आणि उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक (USBRL) प्रकल्प यांचा समावेश आहे. त्याचबरोबर ४६,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. यातील चिनाब पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असणार आहे. जम्मू काश्मीरमधील हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आणि महत्त्वकांशी मानला जात आहे.


काय आहे चिनाब पूलाची वैशिष्ट्ये?

चिनाब नदीपासून 359 मीटर उंचीवर असलेला वास्तुशिल्पाचा अद्भुत नमूना चिनाब रेल्वे पूल आहे. हा जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज आहे. हा १,३१५ मीटर लांबीचा स्टील आर्च ब्रिज आहे जो भूकंप आणि वाऱ्याच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी डिझाइन केलेला आहे. पुलाचा एक महत्त्वाचा परिणाम जम्मू आणि श्रीनगरमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यात होईल. पुलावरून जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनद्वारे, कटरा आणि श्रीनगर दरम्यान प्रवास करण्यासाठी फक्त ३ तास ​​लागतील, ज्यामुळे सध्याचा प्रवास वेळ २-३ तासांनी कमी होईल.


भारताच्या या प्रकल्पामुळे शेजारील देशाची झोप उडाली आहे. पंतप्रधान श्री माता वैष्णोदेवी कटरा ते श्रीनगर या दोन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील, ज्यामुळे या प्रदेशातील रेल्वे कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे. यामुळे पर्यटनामध्ये देखील मदत होणार आहे. हे सर्व प्रकल्प हिमालयीन प्रदेश, पीर पंजाल पर्वतरांगाभोवती केंद्रित आहे, ज्याला मोदींचे चिनाब चक्रव्यूह म्हटले जात आहे. यामुळे शेजारील देशांना धडकी भरली आहे.

पाकिस्तानी दहशतवाद्यांचे प्रवेशद्वार असलेल्या पीर पंजाल खिंड म्हणजे काय?

पीर पंजाल खिंड (ज्याला पीर की गली असेही म्हणतात) हा हिमालयाचा विस्तार आहे. मुघल रोडने काश्मीर खोऱ्याला राजौरी आणि पूंछशी जोडते. हे मुघल रोडवरील ३,४९० मीटर (११,४५० फूट) उंचीवरील सर्वात उंच ठिकाण आहे आणि काश्मीर खोऱ्याच्या नैऋत्येस आहे. काश्मीर खोऱ्यातील खिंडीपासून जवळचे शहर शोपियान आहे. पहलगाम हल्ला झालेल्या ठिकाणाजवळील बैसरन खोऱ्यातील जंगले देखील पीर पंजालशी जोडलेली आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page