
भारती विद्यापीठ जीवनसाधना पुरस्कार चित्तमपल्ली यांचे निधन:वयाच्या 93 वर्षी घेतला अखेरचा श्वास, अरण्यऋषी नावाने होती ओळख….
सोलापूर- पद्मश्री सन्मानित, पर्यावरण आणि वन्यजीव लेखक ‘अरण्यऋषी’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ लेखक आणि माजी वनाधिकारी मारुती चितमपल्ली यांचे आज 18 जून रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. सोलापूरमधील त्यांच्या राहत्या घरी सायंकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय पर्यावरण आणि साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना 30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मात्र, दिल्लीहून परतल्यानंतरच त्यांची प्रकृती खालावली होती. ते अंथरुणाला खिळले होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.
हरित विचारवंत हरपला – भुजबळ…
अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या जाण्याने एक हरित विचारवंत हरपला अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी श्रद्धांजली वाहिली. अरण्याच्या अभ्यासात आयुष्य घालवलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्व, वन्यजीवन अभ्यासक, पक्षिशास्त्रज्ञ आणि प्रतिभावंत लेखक मारुती चितमपल्ली यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पक्षिकोश, पाखरमाया, रानवाटा यांसारख्या ग्रंथांमधून निसर्गाचे अद्भुत विश्व मराठी भाषेत शब्दबद्ध करणारे चितमपल्ली यांचे निधन ही मराठी साहित्यक्षेत्र आणि निसर्गप्रेमींसाठी अपरिमित हानी आहे. त्यांच्या जाण्याने एक हरित विचारवंत हरपला आहे. या अरण्यऋषीच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच प्रार्थना! भावपूर्ण श्रद्धांजली! असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
वन्य जीवन विषद करणारी 25 पुस्तके लिहिली…
प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक अशी मारुती चित्तमपल्ली यांची ओळख आहे. मारुती चितमपल्ली यांनी वन खात्यात 36 वर्षे सेवा केली. त्या काळात देशभर संशोधकवृत्तीने भटकंती केली. या भटकंतीत 5 लाख किमी प्रवास. 13 भाषांचे ज्ञान. त्याद्वारे आदिवासी व इतर जमातींशी संवाद साधत माहिती मिळवली. त्या माहितीची नोंद केलेल्या व 30 वर्षे जपून ठेवलेल्या शेकडो डायऱ्या आहेत. डायरीतील नोंदीला शास्त्रीय आधार देत पक्षिकोश, प्राणिकोश व मत्स्यकोशाचे लेखन पूर्ण केले. अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतीची वैशिष्ट्यांसह वन्य जीवन विषद करणारी 25 पुस्तके लिहिली. निसर्गातील हा ठेवा समाजाला कळावा या भावनेतून सतत कार्यरत हा सकारात्मक विचाराचा ऊर्जाकोश म्हणजे विख्यात लेखक मारुती चितमपल्ली.
चितमपल्ली यांची साहित्यसंपदा
पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं, रानवाटा, शब्दांचं धन , रातवा, मृगपक्षिशास्त्र, घरट्यापलीकडे, पाखरमाया, निसर्गवाचन, सुवर्णगरुड, आपल्या भारतातील साप, आनंददायी बगळे, निळावंती , पक्षिकोश चैत्रपालवी, केशराचा पाऊस, चकवाचांदण : एक वनोपनिषद, चित्रग्रीव, जंगलाची दुनिया, An Introduction to Mrigpakshishastra of Hansdev, नवेगावबांधचे दिवस ही चितमपल्ली यांची महत्त्वाची पुस्तके आहेत.
चितमपल्ली यांना मिळालेले पुरस्कार…
▪️विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार
▪️दमाणी साहित्य पुरस्कार
फाय फाउंडेशन पुरस्कार
▪️अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेचा सन्मान
▪️महाराष्ट्र फाउंडेशनचा गौरव पुरस्कार
▪️वेणू मेमन लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड
▪️नागभूषण पुरस्कार
वसुंधरा सन्मान
▪️भारती विद्यापीठ जीवनसाधना पुरस्कार