
मुंबई :- त्रिभाषा सक्तीचा आदेश राज्य सरकारने रद्द झाल्यानंतर आज ठाकरे बंधूच्या पुढाकारातून विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वरळीतील NSCI डोममध्ये हा विजयी मेळावा होत आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू जवळपास २० वर्षाच्या कालावधीनंतर राजकीय मंचावर एकत्र दिसणार आहेत. ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना प्रवेश करण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे. त्यामुळे या ठिकाणी गोंधळाचे वातावरण असल्याचे दिसून आले आहे.
आज वरळीत होणाऱ्या मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मुंबईतील या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्यासाठी पुणे, नाशिकसह इतर भागातूनही कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. काही वेळेतच मेळाव्याची सुरुवात होणार आहे. आजच्या ऐतिहासिक विजयी मेळाव्यात कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यास सुरुवात केली आहे.
आजच्या या विजयी मेळाव्यासाठी हजर राहण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत. मात्र, गेट क्रमांक ५ वर कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या कार्यकर्त्यांकडे पासची मागणी केली. मात्र, आजच्या कार्यक्रमासाठी सगळ्यांना जाहीर आमंत्रण असून पास दिले नसल्याची माहिती यावेळी पोलिसांनी अडवलेल्या कार्यकर्त्यांनी दिली. जे पदाधिकारी, नेते पुढील रांगेत बसणार आहेत, त्यांच्यासाठी पास दिले असल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी मज्जाव केल्याने वरळी डोमबाहेर एकच गोंधळ उडाला आहे.