काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा नेमका रोख कुणाकडे…?

जनशक्तीचा दबाव न्यूज | मे ०४, २०२३.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या मित्रपक्षांबाबत मोठे विधान केले आहे. लोकशाही व्यवस्था संपविण्याचे पाप करणाऱ्या मोदी सरकारविरोधात काँग्रेसची लढाई आहे. आमच्याबरोबर कुणालाही फरफटत नेण्याचा आमचा उद्देश नाही, असे सूचक वक्तव्य पटोले यांनी केले.
पटोले यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला. ते पुढे म्हणाले, आमची भूमिका स्पष्ट आहे. लोकशाही व्यवस्थेला संपविण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे. या विरुद्ध जे कोण लढत आहेत त्यांना सोबत घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे.
लोकशाही व्यवस्था संपविण्याचे पाप जे मोदी सरकार करत आहे त्या सरकारविरोधात काँग्रेसची ही लढाई आहे. त्याचे परिणाम आम्ही भोगत आहोत. राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं. त्यांना बेघर करण्यात आलं. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांना खोटे आरोप लावून वारंवार ईडीच्या चौकशीसाठी बोलावले जात आहे.
आमचा कुणालाही आमच्याबरोबर फरपटत नेण्याचा कार्यक्रम नाही. बीजेपी विरोधात आमची लढाई आहे. त्यामुळे कुणाला आमच्याबरोबर जबरदस्तीने घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न नाही, असे पटोले म्हणाले.
राज्यातील परिस्थितीवर लक्ष द्या…
सध्या पावसामुळे धिंगाण सुरू आहे. अस्मानी संकट आहे. राज्यात ठिकठिकाणी गारांचा पाऊस सुरू आहे. राज्यात सध्या जी अवस्था आहे त्यावर लक्ष केंद्रीत करण्याची सध्या गरज आहे. त्यावर सरकार काहीच बोलायला तयार नाही. महाविकास आघाडीच्या सभा सध्या पावसाळ्याच्या परिस्थितीत होणार नाहीत, असेही त्यांनी सांगतले.