
मुंबई- गणेशोत्सवाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी गणेशमंडळांकडून जोरदार तयारी सुरू आहे. यंदा १९ सप्टेंबरला गणपतीचं आगमन होणार आहे. अशातच गणेशोत्वासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
मुंबईत नोकरीसाठी असलेले चाकरमानी दरवर्षी गणेशोत्वासानिमित्त गावी परत जात असतात. गणेशोत्सव साजरा करुन परत ते मुंबईला येतात. यावेळी त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, म्हणून मध्य रेल्वेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवात रेल्वेच्या विशेष फेऱ्यांचं आयोजन केलं आहे.
मध्य रेल्वेने याबाबतची माहिती ट्विट करून दिली आहे. त्यामुळे तिकीट वेटिंगवर असलेल्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान एलटीटी मंगळुरु अप आणि डाऊन च्या एकूण १६ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मुंबईतून कोकणात जाणाऱ्या तीन गाड्यांच्या डब्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते मंगळुरु, एलटीटी ते कुडाळ आणि दिवा-चिपळूण मेमूच्या डब्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. या तीन गाड्यांचे एकूण १६ डबे वाढवण्यात आले आहेत.
त्यामुळे आता एलटीटी कुडाळ आणि कुडाळ एलटीटी या गाड्यांचे दोन स्लीपर कोच वाढवले जाणार आहे. तर मंगळुरु-एलटीटी एक्स्प्रेसला देखील दोन स्लीपर कोच अतिरिक्त असतील. याशिवाय दिवा चिपळूण आणि चिपळूण दिवा मेमू स्पेशल गाडीला ८ डबे होते. त्या डब्यांची संख्या वाढवून १२ करण्यात आली आहे. दिवा चिपळूण मेमू १३ सप्टेंबर ते १९सप्टेंबर आणि २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यानं धावेल. या गाडीच्या एकूण १८ फेऱ्या होतील. तर चिपळूण ते दिवा मेमूच्या १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर आणि २३ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान १८ फेऱ्या होतील. याची अंमलबजावणी १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान होईल, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.