
*रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील तरुणाचा अणूस्कुरा घाटात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण हा मृत्यू संशयास्पद असल्याचे तपासातून दिसून येतेय.*
*रत्नागिरी :* रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील तरुणाचा अणूस्कुरा घाटात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण हा मृत्यू संशयास्पद असल्याचे तपासातून दिसून येतेय. अणुस्कुरा घाट मार्ग गेले काही दिवस धोकादायक ठरत आहे. याच घाटात बुधवारी मध्यरात्रीनंतर पहाटेच्या दरम्यान हा कारचा भीषण अपघात झाला होता. लांजा येथून बेपत्ता असलेल्या या युवकाचा मृतदेह या घाटात मिळाला आहे. पोलीस आता हा अपघात आहे की आत्महत्या या दिशेने तपास करत आहेत.
प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचा अंदाज असला तरी आता पोलीस आत्महत्येच्या दिशेने ही तपास करत आहेत. लांजावर व राजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. कौस्तुभ विजय कुरूप वय वर्ष ३० असं लांजा येथील या मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. सुरुवातीला हा अपघात झाल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली नव्हती मात्र गुरुवारी सायंकाळी उशिरा हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या घाटात अपघात झालेली ईरटीका कार ही लांजा पोलीस चेक पोस्ट येथून मध्यरात्री उशिराच्या दरम्यान पास झाली. मात्र त्यानंतर एका अवघड वळणात कोल्हापूरच्या दिशेने जाताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी मागच्या बाजूने खाली आली असावी, असं प्रथम दर्शनी दिसत आहे. अपघात झालेल्या स्थितीत गाडीचे इंजिन दिसलं व जवळच मृतदेह मिळाला. अपघात झाल्याचे कळताच लांजा व राजापूर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र पाऊस असल्याने हे पुरावे गोळा करण्यासाठी अडथळे आले. त्यानंतर या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मृत्यू झालेला युवक लांजा येथील असल्याचा स्पष्ट झाले. हा तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीने मंगळवारी लांजा पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
लांजा येथे या युवकाचा सायबर कॅफेचा व्यवसाय आहे. मात्र घरगुती कारणामुळे आत्महत्या झाली असावी, असा पोलिसांना संशय आहे. ही घटना घाटात राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या संशयास्प घटनेचा तपास सुरू आहे.