
मुंबई- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांना एक महत्त्वपूर्ण पत्र लिहिले आहे. या पत्रामुळे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होण्याचा मार्ग सुकर झाला असून, यामुळे कोकणातील प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
गेल्या काही काळापासून कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याची मागणी वाढत होती. गोवा, कर्नाटक आणि केरळ या राज्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता आणि आता महाराष्ट्र सरकारनेही याबाबत हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे कोकण रेल्वेला चांगले दिवस येतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना १९९० मध्ये पश्चिम घाटातील आव्हानात्मक भूभागावर रेल्वे प्रकल्प हाती घेण्यासाठी झाली होती. कॉर्पोरेशनला रोहा, महाराष्ट्र ते मंगळूर, केरळ पर्यंतच्या रेल्वे लाईनचे सर्वेक्षण आणि बांधकाम करण्याचे काम सोपवण्यात आले होते. सुरुवातीला, भारत सरकारचा २२%, महाराष्ट्र १५%, गोवा ६% आणि केरळ ६% असा भागभांडवल होता. ९ नोव्हेंबर २०११ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या रचनेत बदल करण्यात आले.
कॉर्पोरेशनने रोहा ते मंगळूर दरम्यान रेल्वे लाईनचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. सध्या या मार्गावर विशेष प्रवासी सेवा चालवल्या जातात, ज्याचा मोठ्या प्रमाणात प्रवाशांना लाभ होतो. कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी उत्पन्नाचे चांगले स्रोत विकसित केले आहेत, ज्यामुळे त्यांचा आर्थिक आधार अधिक मजबूत झाला आहे. महसुली उत्पन्नात वाढ आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता, महाराष्ट्र सरकारने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता दिली आहे. इतर भागधारकांनीही विलीनीकरणासाठी संमती दिली आहे.
महाराष्ट्र शासनाने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरणासाठी आपली संमती दिली आहे. तसेच, यापूर्वी कॉर्पोरेशनला दिलेले रु. ३९६.५४२२ कोटी रुपये परत मिळण्याची मागणी केली आहे. या विलीनीकरणानंतर ‘कोकण रेल्वे’ हे नाव त्याच्या प्रादेशिक महत्त्वामुळे कायम ठेवावे, अशीही विनंती पत्रात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना भारतीय रेल्वे मंडळाला नमूद केल्याप्रमाणे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची विनंती केली आहे. या पत्रामुळे कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता असून, यामुळे कोकणच्या विकासाला गती मिळेल आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील अशी आशा आहे.