
मुंबई : संसदेच्या अंदाज समितीला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या औचित्याने भव्य राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन मुंबईतील महाराष्ट्र विधिमंडळात करण्यात आले आहे. या ऐतिहासिक प्रसंगी भारतातील सर्व राज्यांतील अंदाज समित्यांचे प्रमुख व सदस्य तसेच संसदेच्या अंदाज समितीचे प्रमुख व सदस्य सहभागी होत आहेत.
या राष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांचे स्वागत अंदाज समितीचे प्रमुख मा. अर्जुन खोतकर आणि चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. शेखर निकम यांनी संयुक्तरीत्या केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, समारोप सोहळा उद्या, दिनांक २४ जून रोजी महाराष्ट्राचे मा. राज्यपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
या महत्त्वपूर्ण उपक्रमाद्वारे संसदीय कार्यपद्धतीतील अंदाज समितीच्या योगदानाचा आढावा घेण्यात येणार असून, देशभरातील सदस्य आपले अनुभव व विचार मांडणार आहेत. संसदीय लोकशाहीची घडी अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत मोलाचा ठरणार आहे.
या सोहळ्यात विविध राज्यांतील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि संसदीय कार्यातील जाणकार मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.