
*रत्नागिरी, दि. 03 (जिमाका) : कामगार विभागाची योजना ही सर्वसामान्यांसाठी आहे. महिलांसाठी आहे. अशा योजनांचा लाभ देण्यासाठी कुणी पैसे मागत असेल, तर नावासह तक्रार करावी. अशा प्रवृत्तीवर पोलीस कारवाई केली जाईल. त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.*
चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात कामगार आयुक्त कार्यालयामार्फत चिपळूण तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच, सुरक्षा संच व गृहपयोगी साहित्य वाटपाचा कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या हस्ते आज झाला. यावेळी तहसिलदार प्रवीण लोकरे, सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे, नगरपालिका मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रकाश देशपांडे, बाबू म्हाप, सचिन कदम, अशोक शिंदे आदी उपस्थित होते.


पालकमंत्री डॉ.सामंत म्हणाले, आमच्या सगळ्यांचा डोलारा कामगारांमुळे उभा आहे. म्हणून चिपळूणमध्ये दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास मी उपस्थित आहे. या योजनेचे अर्ज भरुन देण्यासाठी पाचशे रुपये, कीट देण्यासाठी दीड हजार रुपयाची मागणी होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. अशांची नावासह तक्रार केल्यास शंभर टक्के पोलीस कारवाई केली जाईल. त्यासाठी पुढाकार घ्यावा. ही योजना सुखामध्येही आणि दु:खामध्येही उपयुक्त आहे. अपघातात जखमी, मृत्यू झाल्यास कुटूंबास मदत देणारी आहे. दहा हजारापासून पन्नास हजारापर्यंत कामगारांची नोंदणी करण्यापर्यंत गेलो आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आपल्यासाठी असणाऱ्या योजना समजून घेतल्या पाहिजेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना अमेरिकेला पाठविण्याची राज्यात सर्वप्रथम रत्नागिरी जिल्ह्याने योजना सुरु केली. जिल्ह्यातील एक लाख महिलांना कॅन्सर होवू नये म्हणून, लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. या डोसमुळे 92 टक्के महिलांना कॅन्सरचा धोका टळल्याचे डब्ल्यूएचओने सांगितले आहे. त्यासाठी 9 ते 14 वयोगटातील 50 हजार मुलींना देण्यात येणाऱ्या डोससाठी 6 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. महिलांच्या कल्याणाची योजना सगळ्यांनी उचलून धरली पाहिजे.


अंमली पदार्थापासून पुढची पिढी वाचविण्याचे काम आपल्या सर्वांना करावयाचे आहे असे सांगून पालकमंत्री डॉ.सामंत म्हणाले, अंमली पदार्थ विरोधात कुणीही कोणतीही तडजोड करु नये त्याबाबत कारवाई झालीच पाहिजे. नव्वद दिवसांचे मिशन राबवून अंमली पदार्थांच्या विक्रेत्याचे मूळ ठेचले पाहिजे.
यावेळी लाभार्थ्यांना विविध योजनांचे धनादेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच दीपप्रज्वलन करण्यात आले. सहायक कामगार आयुक्त श्री. आयरे यांनी स्वागत, प्रास्ताविक करुन कामगार विभगाच्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाला नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.