

*लीड्स-* पहिल्या अँडरसन-तेंडुलकर कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतावर 5 गड्यांनी मात करत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हेडिंग्ले मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शेवटपर्यंत झुंज दिली, मात्र इंग्लिश फलंदाजांनी संयम राखत विजय खेचून नेला. भारताने दुसऱ्या डावात ऋषभ पंत आणि के.एल. राहुलच्या शानदार शतकांच्या जोरावर इंग्लंडपुढे 371 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र इंग्लंडच्या बेन डकेट, जॅक क्रॉली आणि जो रूट यांच्या संयमी खेळीने यजमानांनी हे आव्हान पाच गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
हा भारतीय संघाच्या खूपच जिव्हारी लागला, कारण या सामन्यात भारतीय फलंदाजांनी झंझावाती कामगिरी केली होती. भारताच्या डावात एकूण पाच शतके झळकली, ऋषभ पंतने दोन्ही डावांत शतक ठोकून ऐतिहासिक कामगिरी केली. त्याचबरोबर यशस्वी जैस्वाल, कर्णधार शुभमन गिल आणि के एल राहुल यांनीही दमदार शतके ठोकली. पण या फलंदाजीच्या झगमगाटाला भारतीय गोलंदाज साथ देऊ शकले नाहीत. पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने 5 बळी घेत इंग्लंडला अडचणीत आणले, पण दुसऱ्या डावात तो अपयशी ठरला. प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांनीही अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. निर्णायक दिवशी भारताला विजयासाठी झटणं अपेक्षित होतं, पण खराब गोलंदाजीमुळे इंग्लंडने सहज लक्ष्य गाठलं. या विजयानंतर पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 1-0 ने आघाडी घेतली आहे.