
रत्नागिरी: एसटी महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये लवकरच भरती प्रक्रिया राबवणार आहे. नोकरभरती मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाल्यास जिल्ह्यासह राज्यभरात एसटीमध्ये मेगा नोकरभरती होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एसटीच्या तब्बल ९४० पदे रिक्त आहेत. या रिक्त जागेवर चालक वाहक व अन्य पदांची भरती होणार आहे.
पूर्वी एसटीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेवून एसटीतील नोकर भरतीला २०२४ पर्यंत उच्च न्यायालयाने मनाई केली होती. येत्या काही वर्षामध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. या कर्मचाऱ्यांसह अभियंत्यांची रिक्त पदे करार पध्दतीने आणि सरळसेवा भरतीच्या माध्यमांतून भरण्यात येणार आहे.
भविष्यात २५ हजार एसटी बसेस राज्यात येणार आहेत. त्यामुळे चालक, वाहकासह अन्य पदांची गरज भासणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आगारात तब्बल ९४० पदे रिक्त असून त्यामध्ये चालक वाहकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे इतर चालक वाहक यांच्यावर जास्त भार पडला आहे. लिपीक, यांत्रिक, वाहतूक नियंत्रक यासह विविध पदांचा समावेश आहे. आपल्या जिल्ह्यातील रिक्त पदांचा आढावा घेवून आवश्यक पदभरतीसंदर्भात मागणी करण्याच्या सूचनाही परिवहनमंत्र्यांनी दिल्या आहेत. नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाल्यास, नव्याने होणाऱ्या नोकर भरतीकडे रत्नागिरीसह कोकणातील बेरोजगार युवकांचे लक्ष लागले आहे.
नोकर भरतीत कोकणातील भूमिपुत्रांना द्यावी संधी…*
रत्नागिरीत नोकऱ्या नसल्यामुळे कित्येक चाकरमनी मुंबई, पुणे यासह विविध शहरात जावून नोकरी करतात. सण, उत्सवाच्या काळात घरी येत असतात. त्यामुळे त्यांची मोठी ओढाताण होत असते. एसटी महामंडळाने नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला असून बैठक घेवून चर्चा झाली. रिक्तपदांचा प्रस्ताव सरकारपुढे ठेवला आहे. जर नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला तर प्रथम प्राधान्य स्थानिक कोकणकरांना द्यावे, अशी मागणी वाढत आहे. चाकरमान्यांना इथेच रोजगार दिला तर त्यांचे स्थलांतरही थांबेल.