आयएसओ मानांकन मिळालेल्या नेरळ ग्रामपंचायतीत समस्यांचा थांबा, मूलभूत सुविधांसाठी नागरिकांचा संघर्ष रस्त्यावर गटाराचे पाणी, फुटलेल्या मोरीतून प्रवास, रस्ता झाला तोही अर्धवट…

Spread the love

नेरळ : (सुमित क्षीरसागर) नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे स्थानकाजवळच आजाद बेकरी येथील रस्ता हा रहदारीचा मार्ग आहे. येथूनच राजेंद्रगुरुनगर या नेरळमधील सगळ्यात मोठ्या गृहसंकुलात जाण्यासाठी देखील रस्ता आहे. त्यामुळे हा मार्ग कायम पादचारी यांच्याकडून व्यस्त असतो. तर येथील नागरी वस्तीत रस्त्यावर गटाराचे पाणी साचले असून बाजूलाच कचऱ्याचा ढीग लागत असतो. तर हा कचरा उचलायला नेरळ ग्रामपंचायतीची गाडी येत नसल्याने त्यातून दुर्गंधी सुटून येथूल चालणाऱ्या नागरिकांचे नाक मुठीत धरून चालावे लागते. तर वारंवार केलेल्या तक्रारीनंतर येथील रस्ता झाला मात्र तोही अर्धवट ! त्यामुळे आयएसओ मानांकन मिळालेल्या नेरळ ग्रामपंचायतीत समस्यांचा थांबा असून मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे.

नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे स्थानकाजवळ जुनी आजाद बेकरी, सावित्रीबाई फुले मार्ग येथील रस्ता हा रहदारीचा मार्ग आहे. येथूनच राजेद्रगुरुनगर या मोठ्या गृहसंकूलात व हा रस्ता थेट मोहचीवाडी पर्यत जातो. मोहाची वाडीपर्यंत जाण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे मात्र सुविधा नसल्याने हा रस्ता त्रासदायक उरत आहे सदर रस्ता हा जुना आजाद बेकरी ते प्रकाश पगारे यांच्या घरापर्यंतच्या रस्ताची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून चालणे नागरिकांना जोखमीचे झाले आहे. गेले अनेक वर्ष हा रस्ता बनवण्यात आलेला नाही. तर मध्यंतरी गणेशोत्सवाच्या आधी सदर रस्त्याचे काम सुरु केले होते पण ते देखील अर्धवट करण्यात आले आहे. तर येथील परदेशी यांच्या घराजवळील मोरी फुटलेल्या अवस्थेत आहे.

पुढे ओपन प्लॉटवर कचर्याचे ढीग साठून राहिल्यामुळे कचऱ्याची मोठी दुर्गरधी सुटते. तसेच हिंसक श्वान, कावळे व मोकाट घोडे यांची रेलचेल असल्याने लहान मुलांना चालणे जोखमीचे होत आहे. तशीच अवस्था बोहरी मशिदीजवळच्या प्लॉट वर होत आहे. येथे देखील मोठ्या प्रमाणात कचर्याचा ढीग साचतो. कचर्यातून येथे अत्यंत दुर्गंधी पसरलेली असते व त्यामुळे येथील लोकांना रोगराईचा सामना करावा लागतो. तसेच या ठिकाणी ढीगभर कचरा साचल्याने ते कचरा गटारीत जाऊन गटारीवरून पाणी वाहू लागते व ते रस्त्यावर पसरून रस्त्यावर चिखल निर्माण होतो. तसेच येथे सोनोग्राफी सेंटर आहे. त्यामुळे रुग्ण याठिकाणी येत असतात. मात्र येथून येण्याचा मार्ग हा अत्यंत निमुळता असल्याने आणि अवैध पार्किंगचा रस्त्याला विळखा पडत असल्याने रुग्णांना घेऊन येणाऱ्या रिक्षा यायला अडचण निर्माण होते. तर रुग्णवाहिका देखील यायला रस्ता नसल्याने काही नागरिकांच्या जीवावर बेतले असल्याचे भयावह वास्तव आहे.

याबाबत नेरळ ग्रामपंचायतीला अनेकदा सांगून सुद्धा आमचा विचार केला जात नाही. आम्ही माणसं नाहीत का असा जळजळीत प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. तर आता रस्ता, गटार, स्वच्छ परिसर या सुविधा ग्रामपंचायतीने आम्हाला दयाव्यात हा आमचा मूलभूत अधिकार आहे. याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाला दिले आहे. तेव्हा आता ग्रामपंचायतीला जाग येणार कि नागरिकांना हक्कासाठी आंदोलन करावे लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नेरळ आजाद बेकरी ते राजेंद्र गुरू नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात समस्यांचा थांबा आहे. नागरिकांना या समस्यांना रोज तोंड द्यावे लागत आहे. तेव्हा प्रशासनाने लक्ष द्यावे. तसेच या भागात बिनशेती जागेच्या समोरच अतिक्रमण करून गाळे काढण्यात आले आहेत ते अतिक्रमण देखील काढावे. तर येथील रस्ता, गटार नव्याने बांधून येथील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात ही आमची मागणी आहे

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page