
मुंबई- आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी जुळवाजुळव सुरु केली आहे. त्यामुळे आतापर्यंत महाविकास आघाडीतील तीन मित्रपक्ष एकत्रित निवडणूक लढवतील, असे वाटत होते. मात्र, गेल्या काही दिवसातील घडामोडी पाहिल्या तर येत्या काळात राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येणार असतील तर महाविकास आघाडीचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आतापर्यंतच्या हालचाली लक्षात घेता सुरुवातीला मनसे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येतील, असे वातावरण तयार झाले होते. दोघांनीही एकमेकांना साद-प्रतिसाद दिला होता. त्यामुळे लवकरच जागावाटपाची बोलणी होऊन घोषणा होणार की काय असे वातावरण होते. मात्र, अचानक या सर्व कथानकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची बांद्र्यातील हॉटेलमध्ये भेट घेतल्याचे समोर आले. त्यामुळे एकंदरीत सर्वच वातावरण ३६० डिग्रीमध्ये बदलले. त्यामुळे येत्या काळात भाजप व मनसेची महापालिका निवडणुकीसाठी युती होणार अशा बातम्या येऊ लागल्या. त्यामुळे वातावरण पूर्णपणे बदलले. एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांनी या हॉटेलमध्ये घेतलेल्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांना माहिती दिली नाही. त्यामुळे या भेटीबाबतचा सस्पेन्स वाढतच गेला होता. त्यामुळे येत्या काळात नेमके काय घडणार यावरून वातावरण तापले होते.
त्यातच उदय सामंत यांनीही मनसेच्या काही नेत्यांची भेट घेतली. त्यामुळे मधल्या काळात एकनाथ शिंदे यांची शिवसेना व मनसे मुंबई महापलिका निवडणुकीसाठी एकत्र येणार असल्याची चर्चा प्रसार माध्यमांनी जोरदार रंगवली होती. गेल्या आठवड्यातील या सर्व राजकीय घडामोडी सर्वसामान्य नागरिकांना कन्फ्युज करणाऱ्या होत्या. त्यामुळे मनसेसोबत नक्की कोणाची युती होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे नेमके काय होणार याची उत्सुकता वाढली असतानाच या विषयात पुन्हा एकदा सस्पेन्स पहावयास मिळाला. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वी मुंबईतील माजी नगरसेवकांची बैठक घेतली. चार दिवसांपूर्वी झालेल्या मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीतही उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीसाठी मनसेसोबत युती करायची की नाही? याबाबत पक्षाच्या माजी नगरसेवकांना विचारणा केली. त्यावेळी येत्या काळात युती केली तर फायदाच होईल, अशी कबुली माजी नगरसेवकांनी दिल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिन मेळाव्यात मनसेसोबतच्या युतीचे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे पुन्हा एकदा मनसे व उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.