हिंदू-वैश्य, वैश्य, हिंदू-वाणी, वाणी, भाविक गुरव, भा.गुरव पोटजातींमधील संभ्रम दूर करणारा अहवाल प्रांतांनी दोन महिन्यात पाठवावा- राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांची सूचना…

Spread the love

रत्नागिरी- हिंदू-वैश्य, वैश्य, हिंदू-वाणी, वैश्य वाणी, वाणी हे सर्व एकच आहेत आणि भाविक गुरव, भा. गुरव, गुरव देखील एकच आहेत, अशा पोटजातींमधील संभ्रम दूर करणारा अहवाल प्रांताधिकाऱ्यांनी 2 महिन्यात सादर करावा. त्यासाठी संबंधित जातींच्या, पोट जातीच्या लोकांनीही नातेसंबंध, रोटीबेटी व्यवहार, व्यवसाय याबाबतचे पुरावे प्रांतांना द्यावेत, अशा सूचना महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. गोविंद काळे व ज्योतिराम चव्हाण यांनी आज दिल्या.
   
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीत जात पडताळणी समितीचे अध्यक्ष शंकर बर्गे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, सहायक जिल्हाधिकारी डॉ. जस्मिन, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, आकाश लिगाडे, शिवाजीराव जगताप, डॉ. विजय सूर्यवंशी, जात पडताळणी समितीचे उपायुक्त रविंद्र कदम, सहाय्यक संचालक संतोष चिकणे आदी उपस्थित होते. श्री. काळे यांनी सर्वप्रथम जिल्हा प्रशासनाचे आभार मानले. ते म्हणाले, मागील वेळी कुणबी, तिलोरी कुणबी याबाबतचा जिल्हा प्रशासनाने दिलेला अहवाल आयोगामार्फत राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. त्यांनी तो स्वीकारुन त्यांच्या अडचणी सोडविल्या. त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त करतो. आजही वैश्य, वैश्य वाणी, हिंदू वाणी, भा. गुरव, भाविक गुरव, बंजारा समाज याबाबत जात प्रमाणपत्र देताना काही अडचणी असतील तर, त्या सांगाव्यात जेणेकरुन शासनाला आयोगामार्फत तसे कळविले जाईल आणि संबंधितांच्या अडचणी दूर करता येतील.
   
श्री. चव्हाण म्हणाले, सद्या शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियामध्ये जात प्रमाणपत्र देताना काही अडचणी येत असतील तर सविस्तर सांगावे. जिल्ह्यामध्ये असणारी ओबीसी विद्यार्थ्यांची वसतिगृहे, त्यांच्या शिष्यवृत्तीचा काही प्रश्न आहे का.  तसेच आश्रमशाळा याबाबत सविस्तर अहवाल द्यावा. वैश्य व वैश्य वाणी या दोन्ही एकच आहेत, याबाबत नाते संबंध, रोटी बेटी व्यवहार तपासावेत. यासाठी गृह चौकशी अहवालाची मदत घ्यावी. तसेच, भा. गुरव, भाविक गुरव आणि गुरव याबाबत नाते संबध, रोटी बेटी व्यवहार तपासावेत आणि सविस्तर अहवाल 2 महिन्यात आयोगाला सादर करावेत, असेही दोन्ही सदस्यांनी सांगितले. यावेळी मंडणगड येथील विकास शेट्ये यांनी भेटून विविध समस्या सोडविण्याची मागणी केली. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी सर्वांचे आभार मानले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page