
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये धक्कादायक घटना घडली. झोंबडी गावात सुनेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सासऱ्याला गावाने हद्दपार केले. विजय सकपाळ नावाच्या व्यक्तीने हे कृत्य केले होते. ग्रामपंचायतीने एकमुखी ठराव पास करून त्याला हद्दपार केले. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
रत्नागिरी : कोकणात गुहागर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. दारूचा व्यवसाय करून आपल्या सूनेवरतीच वाईट नजर ठेवून वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या संशयित आरोपी असलेल्या विजय शांताराम सकपाळ याला गावातून हद्दपार करण्यात आले आहे. गावाने तसा एक मुखी ठरावच केला आहे. गुहागर तालुक्यामधील झोंबडी गावामध्ये दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सासऱ्याने एका नवविवाहीत सूनेवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
सरपंच अतुल लांजेकर यांनी याबाबत घेतलेल्या पुढाकारचे सर्वांनी कौतुक केले आहे. तसेच यापुढे गावात अशाप्रकारचे कृत्य कोणी केल्यास तशाच प्रकारे कारवाई केली जाणार आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक झालेल्या विजय शांताराम सकपाळ याला गावातून हद्दपार करण्यात यावी, असा एकमुखी ठराव झोंबडी ग्रामपंचायतीच्या पार पडलेल्या ग्रामसभेत एकमुखाने संमत झाला आहे.
झोंबडी येथील विजय शांताराम सकपाळ या साठ वर्षीय इसमाने २१ वर्षीय सुनेचा सातत्याने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. सुनेने त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून गुहागर पोलीस स्थानकात २५ रोजी सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला. सदरचा गुन्हा दाखल होवून दोन दिवस उलटून गेले तरी संबंधित इसमाला पोलीसांनी अटक न केल्याने गुहागर तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत याचा जाब गुहागर पोलिसांना विचारल्यानंतर आरोपी सकपाळ याला अटक करण्यात आली.
दरम्यान, ही घटना अतिशय संताप आणणारी असून सदरच्या घटनेवरून नराधम सासऱ्याने सुनेच्या एकांताचा गैरफायदा घेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अशा प्रकारच्या व्यक्तीमुळे आपल्या गावाची बदनामी होते म्हणून झोंबडी ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल लांजेकर यांनी (शुक्रवार दि. 30) रोजी सकाळी 11. 30 वाजता झालेल्या ग्रामसभेत हा विषय उपस्थित केला. आपल्या कुटुंबातीलच महिलेवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला गावात राहण्याचा कोणताच अधिकार नाही. अशा माणसामुळे समाजात चुकीचा संदेश जातो. तसेच गावातील महिला असुरक्षित वाटू नये, म्हणून सदरील व्यक्तीला गावातूनच हद्दपार करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
या ग्रामसभेला सरपंच अतुल लांजेकर, उपसरपंच प्रणाली पवार, ग्रामपंचायत सदस्या मयुरी लांजेकर, ग्रामस्थ रघुनाथ तावडे, जब्बार ममतुले, संतोष लांजेकर, इस्माईल बंदरकर, विशाखा सकपाळ, नंदा शिगवण, शिम ममतुले, वासुदेव लांजेकर, बिस्मिल्ला बंदरकर, रोशनी सकपाळ, केशव शिरकर, संगिता आंबेकर, सिध्देश राजेंद्र घाग, निरंजन सकपाळ आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.