गर्जा महाराष्ट्र ‘माझा’…

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | मे ०१, २०२३.

आज संपूर्ण राज्यात ‘महाराष्ट्र दिन’ साजरा होत आहे. १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि ‘कामगार दिवस’ म्हणूनही साजरा केला जातो. विशेष म्हणजे आजच ‘गुजरात स्थापना दिवस’ही आहे. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर काही काळ गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य मुंबई प्रांताचे भाग होते. त्यावेळी या मुंबई प्रांतात मराठी आणि गुजराती भाषिकांची संख्या अधिक होती. दोन्ही भाषिकांकडून स्वतंत्र राज्याची मागणी केली जात होती. त्यामुळे भाषावार प्रांतरचनेमुळे गुजरात आणि महाराष्ट्र या दोन वेगळ्या राज्यांची घोषणा करण्यात आली. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. त्यामुळे १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.

तत्कालीन केंद्र सरकारच्या माध्यमातून १९५६ च्या राज्य पुनर्गठन अधिनियमानुसार अनेक राज्यांची स्थापना करण्यात आली. भाषावर प्रांतरचना करण्यात आली. कन्नड भाषा बोलणाऱ्यांसाठी कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली. तर तेलुगू भाषिकांसाठी आंध्रप्रदेश आणि मल्याळम बोलणाऱ्यांसाठी केरळ राज्याची स्थापना करण्यात आली. तामिळ बोलणाऱ्यांसाठी तामिळनाडूची निर्मिती झाली. पण त्यावेळी मराठी आणि गुजराती भाषा बोलणाऱ्यांसाठी वेगळं राज्य निर्माण करण्यात आलं नाही. गुजरात आणि महाराष्ट्र हा मुंबई प्रांताचाच एक भाग होता.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी भाषिकांनी जोरदार आंदोलन केलं. गुजराती भाषिकांनीही वेगळ्या राज्याची मागणी लावून धरली. जाळपोळ, मोर्चे आणि आंदोलने सुरू होती. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०५ जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. फ्लोरा फाऊंटन येथे संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रचंड आंदोलन करण्यात आले. त्यावेळी मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे गोळीबार करण्याचा आदेश देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ आंदोलक हुतात्मा झाले. त्यानंतर केंद्र सरकारने १ मे १९६० रोजी मुंबई प्रांताचे बॉम्बे पुनर्गठन अधिनियम १९६० नुसार दोन भाग करत महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली.

दोन राज्यांच्या निर्मितीनंतर मुंबई आपल्याच मिळावी म्हणून मराठी आणि गुजराती भाषकांमध्ये वाद निर्माण झाला. त्यावरही आंदोलन सुरू झाले. मुंबईत सर्वाधिक मराठी भाषिक राहत आहेत. भाषावार प्रांतरचनेच्या निकषामुळे ज्या भागात मराठी बोलणारे अधिक तो भाग त्या राज्याला दिला पाहिजे हे ठरलं आहे. त्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे, असा आग्रह मराठी भाषकांनी धरला. तर मुंबईची जडणघडण आमच्यामुळेच झाल्याचा दावा करत मुंबई गुजरातला देण्याची मागणी गुजराती भाषकांनी केली होती. पण मराठी भाषकांच्या प्रखर विरोधामुळे आणि आक्रमक आंदोलनामुळे अखेर मुंबई महाराष्ट्राला मिळाली. संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page