
नवी दिल्ली- दिल्लीतील विविध भागात शुक्रवारी पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक भागा पूरस्थिती निर्माण झाली आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दिल्ली आणि परिसरात जोरदार वारे वाहू लागले. त्यामुळं अनेक भागात झाडं पडण्याच्या घटना घडल्या आहेत.
द्वारका येथील खारखरी कॅनॉल गावात आज पहाटे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतात बांधलेल्या ट्यूबवेलच्या खोलीवर झाड पडल्यानं ४ जणांचा मृत्यू झाला असून, एक जण जखमी झाला आहे. २६ वर्षीय ज्योती आणि तिच्या तीन मुलांचा मृत्यू झालाय. तिचा पती अजय किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
पावसामुळं विमानसेवा विस्कळीत झाली आहे. 40 हून अधिक विमानांची दिशा बदलण्यात आली, तर 100 हून अधिक विमानांना उशीर होणार आहे. दिल्लीतील रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली आहे. रस्त्यावर पाणी साचल्यानं अनेक भागात वाहतूक कोंडी आहे. भारतीय हवामान खात्यानं राजधानी दिल्लीसाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. हवामान खात्यानुसार, दिल्लीसह आजूबाजूच्या परिसरात 70 ते 80 किमी प्रति तास वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळं सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.