
मुंबई- ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू काळाच्या पडद्याआड, मनोरंजन विश्वावर पसरली शोककळा,मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ व बहुपरिचित अभिनेते विवेक लागू यांचे निधन झाले. त्यांनी 19 जून रोजी सायंकाळी साडे सहा वाजता शेवटचा श्वास घेतला. विवेक लागू यांच्या पार्थिवावर 20 जून, शुक्रवार रोजी मुंबईतील अंधेरी येथील ओशिवरा स्मशानभूमीत सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. विवेक लागू यांचे निधन नेमके कोणत्या कारणामुळे झाले, हे अद्याप समोर आलेले नाही. त्यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली असून एक अनुभवी आणि गुणी कलाकार हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
विवेक लागू हे दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती होते. अभिनेत्री आणि लेखिका मृण्मयी लागू ही त्यांची मुलगी आहे.
विवेक लागू यांनी आपल्या अभिनय प्रवासात अनेक मराठी व हिंदी मालिकांमध्ये तसेच चित्रपटांत प्रभावी भूमिका साकारल्या. त्यांनी ‘चार दिवस सासूचे’ आणि ‘हे मन बावरे’ यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. त्यांच्या ‘चार दिवस सासूचे’, ‘हे मन बावरे’ या मालिकाही गाजल्या होत्या. तसेच गोदावरीने काय केले (2008), अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘अग्ली’ (2013), व्हॉट अबाउट सावरकर (2015), 31 दिवस (2018) यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे.
*नाटकांच्या स्पर्धांमधून झाली रीमा लागूशी ओळख…*
विवेक लागू आणि रीमा यांची बँकांमधील नाटकांच्या स्पर्धांदरम्यान ओळख झाली. त्यावेळी रीमा लागू या अभियनासोबत बँकेतही नोकरी करत होत्या. विवेक तेव्हा 23 वर्षांचे होते आणि रीमा 18 वर्षांच्या. दोघांनी दोन वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर 1978 साली विवाह केला. त्यांचे नाते जवळपास तीन दशके टिकले, मात्र नंतर काही कारणास्तव त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. तरीही त्यांच्यात परस्पर सन्मानाचे नाते कायम राहिले. रीमा लागू यांचे 2017 साली निधन झाले. तोपर्यंत घटस्फोट झालेला असतानाही दोघांमध्ये सलोख्याने नाते होते.
*विवेक लागूंची मुलगी बॉलिवूडमध्ये लेखिका…*
विवेक लागू आणि रीमा लागू यांची कन्या मृण्मयी लागू-वायकुळ ही बॉलिवूडमध्ये एक आघाडीची लेखिका म्हणून प्रसिद्ध आहे. ‘थप्पड’ आणि ‘स्कूप’ यांसारख्या महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सच्या लेखिका म्हणून तिने नाव कमावले आहे. तिने ‘मुक्काम पोस्ट लंडन’ या चित्रपटातून अभियन देखील केला होता.