
*संगमेश्वर प्रतिनिधी-* संगमेश्वर तालुक्यातील कडवई जिल्हा परिषद गटाचे सदस्य व माजी जिल्हापरिषद अध्यक्ष संतोष थेराडे यांचा ५० वा वाढदिवस कडवई येथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उद्योजक विजय कुवळेकर यांनी संतोष थेराडे यांची घाटकोपर मुंबई येथे शाखाप्रमुख म्हणून सुरू झालेली राजकीय कारकिर्द जिल्हा परिषद अध्यक्ष पदापर्यंत कशी पुढे गेली याचा आलेख उभा केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गुहागर मतदार संघाचे आमदार श्री.भास्कर जाधव यांनी तडाखेबंद भाषण करून उपस्थित कार्यकर्त्यांना संघटना वाढीसाठी आवाज दिला.ते म्हणाले की,’ थेराडे यांना चांगलं भविष्य आहे कारण थेराडे रस्त्यावर उतरून लढा देणारे कार्यकर्ते आहेत.सध्या जरी वाईट दिवस दिसत असले तरी शिवसेना की कोणाच्या बापाला संपणार नाही.संतोष थेराडे यांचे कौतुक करताना ते म्हणाले की पुराणात तीन सत्कारांना महत्व आहे.धृतराष्ट्राने भीमाचा केलेला सत्कार,सीतेने हनुमानाचा केलेला सत्कार आणि रामाने सेतू बांधताना छोटीशी मदत केलेल्या खारुताईचा सत्कार, पण सर्वात महत्वाचा ठरतो तो खारुताईचा सत्कार तसाच आज थेराडे यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला सत्काराचे महत्व आहे.तुमच्या पाठीशी असणाऱ्या कार्यकर्त्यांचा भक्कम पाठिंबा हीच तुमची सर्वात मोठी कमाई आहे.सत्काराला उत्तर देताना श्री.संतोष थेराडे यांना गहिवरून आले.त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानताना त्यांचा विश्वासास पात्र ठरण्याचा नक्की प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
.
या कार्यक्रमाला शिवसेना संपर्क प्रमुख सहदेव बेटकर, माजी शिक्षण सभापती ऐश्वर्या घोसाळकर,मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, जिप अध्यक्ष रोहन बने,बंड्या बोरूकर छोट्या गवाणकर,मुन्ना थरवळ, जयेश चव्हाण,विजय देसाई, अनंत उजगावकर,दत्ता लाखण, शिव वैभव पतसंस्थेचे प्रकाश थेराडे, अरविंद जाधव,अजिंक्य ब्रिद,आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात ‘कोण होणार महाराष्ट्राचा सुपरस्टार’ फेम कोकणकन्या अनन्या खेराडे हिचा विशेष सत्कार करण्यात आला.त्यानंतर इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना शाळापयोगी साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच या वर्षी ज्या नमन मंडळानी २५ पेक्षा जास्त कार्यक्रम सादर केले अशा नमन मंडळांतील लोककला कलाकारांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यात राजेश्वरी नमन मंडळ,कडवई ओकटेवाडी ,हौशी कलाकार, गोळवली,वरदान देवी नृत्य कलापथक तुरळ हरेकर वाडी,वाघजाई तुरळ धोंगडवाडी, वाघजाई नमन मंडळ, माभळे, ग्रामदैवत नमन मंडळ जाधववाडी या नमन मंडळांतील कलाकारांचा समावेश होता.
रात्री राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शाहीर सम्राट देवानंद माळी यांचा ‘लोकरंग महाराष्ट्राचा’ हा लोकसंस्कृतीचा जागर करणारा कार्यक्रम सादर झाला.या कार्यक्रमात महाराष्ट्रातील गण,गौळण, दिंडी,कोळी नृत्य,भारुड,गोधळ,वासुदेव, पिंगळा,पोवाडा असे विविध कलाप्रकार सादर करून रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळविली ..
या कार्यक्रमाचे आकर्षण ठरला ‘ कोण होणार सुपरस्टार, महाराष्ट्राचे छोटे उस्ताद कार्यक्रमाच्या प्रथम पर्वाचा विजेता पृथ्वीराज माळी आणि त्याचे साथीदार शौर्य माळी आणि राज माळी त्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने रसिक प्रेक्षकांना आपल्या गाण्यावर थिरकायला लावलं. शिवराज्यभिषेकाने हा कार्यक्रम संपन्न झाला.लोकरंग महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन रणजित कांबळे यांनी केले.
.
वाढदिवसाच्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री निलेश कुंभार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.संतोष थेराडे मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली.