

गुजरातमधील अहमदाबाद इथे एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. हे विमान रहिवासी भागात कोसळल्यामुळं मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे….
मुंबई : गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. कर्मचाऱ्यांसह तब्बल 242 प्रवाशांना घेऊन जाणारं प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात कोसळलं आहे. त्यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हा अपघात नेमका कशामुळं घडला? यामागील कारणं शोधण्यात येईल. मात्र, दोन्ही इंजिन एकाचवेळी बंद पडली असावीत किंवा उड्डाण घेतल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळं विमान कोसळलं असावं, असा अंदाज वैमानिक कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी वर्तवला आहे.
कशामुळं कोसळलं एअर इंडियाचं विमान? : माजी आमदार असलेले अडसूळ हे शिंदे शिवसेनेमध्ये आहेत. त्यांचा व्यावसायिक उड्डाणाचा मोठा अनुभव आहे. त्यांच्याशी ‘ईटीव्ही भारत’ने संपर्क करुन अपघातामागील संभाव्य कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं, “विमान आकाशात झेपावल्यानंतर लगेच कोसळले. जो व्हिडिओ समोर आला आहे, तो पाहता दोन्ही इंजिनमध्ये बिघाड होऊन ते बंद पडलं असू शकतं. विमान खाली येताना दिसत आहे, वाकडे तिकडे खाली येताना दिसत नाही. दुसरी शक्यता म्हणजे, उड्डाणानंतर विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाली असू शकतो, ज्यामुळं विमान वर जाऊ शकले नाही आणि ते कोसळले. फ्लॅप किंवा स्पॉईलर्स अडकणे किंवा इतर काही कारणामुळं ड्रॅग वाढतो आणि त्यामुळं विमान खाली येते. एक इंजिन बंद झाले तरी विमान उडू शकते. त्यामुळं दोन्ही इंजिन बंद पडण्याची शक्यता जास्त वाटते. यापूर्वी ७३७ प्रकारच्या विमानांमध्ये तांत्रिक अडचण होती. त्यामुळं देखील विमान क्रॅश होऊ शकतं.” वैमानिक अनुभवी असलं तरीही दोन्ही इंजिन बंद पडल्यानंतर काहीही करु शकत नाही. वैमानिकाने कदाचित “मेडे मेडे” सिग्नल दिलाही असू शकतो, असं अडसूळ म्हणाले.
पक्षी धडकल्यामुळं दोन्ही इंजिन बंद पडू शकतात : अभिजीत अडसूळ म्हणाले, “अहमदाबाद येथील विमानतळावर पक्षी धडकण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळं पक्षी धडकल्यानंतर इंजिन बंद पडण्याचीही शक्यता आहे. एकचवेळी दोन किंवा जास्त पक्षी इंजिनाला धडकू शकतात. पूर्वी अनेकदा मी स्वत: अहमदाबाद येथे हा अनुभव घेतला आहे. माझ्या विमानाला अहमदाबाद येथे लँडिंगच्यावेळी पक्षी धडकला होता. विमान धावपट्टीजवळ असल्यामुळं विमानाचे सुखरुप लँडिंग करता आले.”
घातपाताची शक्यता नाही : विमान कोसळल्याच्या घटनेत घातपाताची शक्यता कमी वाटते. कारण, विमानाचे पुढील टोक आकाशाच्या दिशेने आहे. विमान जर पाडण्यात आले असते तर नाकाची म्हणजेच समोरची बाजू खाली असती, असं अभिजीत अडसूळ म्हणाले.