
रत्नागिरी: काळबादेवी येथून जाणाऱ्या सागरी महामार्गाबाबत महत्वपूर्ण बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत मिऱ्या ते काळबादेवी पुलाला जोडून फ्लाय ओव्हर ब्रीज उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. हा ब्रीज थेट नवानगर-पाथरदेव येथे जोडण्यात येणार असून पुढील मार्ग बसणीतून थेट आरे वारेला जोडण्यात येणार आहे. याबाबत आठ दिवसात जागेची अंतिम मोजणी करण्यात येणार आहे.
प्रस्तावित सागरी महामार्गाच्या आराखड्याबाबत रविवार १ जून रोजी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला एम एस आर डी सी चे अधिकारी आणि काळबादेवी येथील प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते. सागरी महामार्ग समुद्रलगत जावा अशी येथील स्थानिक ग्रामस्थांची मागणी होती. ग्रामस्थांच्या आक्रमक पाठपुराव्यामुळे समुद्रमार्गे सागरी महामार्ग होण्यासाठी एम एस आर डी सी मार्फत सर्वेक्षण देखील करण्यात आले. मात्र या मार्गावर असलेल्या वन खात्याच्या सुरुबनामुळे समुद्र मार्गे सागरी महामार्ग नेण्यावर बंधने आली. वन खात्याने सुरुबन तोडून सागरी महामार्गाला नकार दिल्याचे रविवारी झालेल्या बैठकीत सांगण्यात आले.
रविवारी झालेल्या बैठकीत मिऱ्या-काळबादेवी खाडीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाला जोडूनच फ्लाय ओव्हर ब्रीज उभारण्याचा येणार असल्याची माहिती एम एस आर डी सी च्या उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली. हा ब्रीज उभारताना काळबादेवी येथील एकाही घराला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली जाईल. समुद्र मार्गे हा ब्रीज न नेता हा ब्रीज थेट नवानगर – पाथरदेव येथे मुख्य मार्गाला जोडण्यात येणार आहे. सध्याच्या रत्नागिरी – गणपतीपुळे मार्गावरील बसणी रस्त्याला हा सागरी महामार्ग जोडण्यात येणार आहे. पुढील आठ दिवसात बसणी मार्गे जाणाऱ्या सागरी महामार्गासाठी अंतिम जागा निश्चिती करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली. मात्र बसणी येथून महामार्ग नेमका कसा जाणार याबाबत मात्र अनिश्चितता आहे.