
आशिष शेलारांच्या समोरच भाजपच्या दोन गटात राडा झाल्याची घटना घडली. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच ही घटना घडली.
*मुंबई :* आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपसहित सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारी सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांची लगबग पाहायला मिळत आहे. भाजप पक्षानेही पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. या पक्षबांधणीदरम्यानच भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मुंबईच्या कांदिवली पूर्वेत जानुपाडा परिसरात भाजपच्या दोन गटात राडा झाला.
मुंबईच्या कांदिवली पूर्वे परिसरातील जानुपाडामध्ये उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार आज शुक्रवारी सकाळी भेटीला आले. त्यावेळीच भाजप कार्यकर्त्यांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. पोलीस आणि पालकमंत्री आशिष शेलार यांच्या समोरच भाजपच्या दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाली. दोन गटाच्या हाणामारीमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. यानंतर समता नगर पोलिसांनी भाजप पदाधिकारी देवांग दवे यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले.
दोन गटाच्या तुंबळ हाणामारीनंतर समता नगर पोलीस स्टेशनमध्ये भाजप नेते पोहोचून देवांग दवे यांची मनधरणी करत तक्रार न देण्याची विनंती केली. जो गोंधळ झाला आहे, त्यावर पक्षाचे वरिष्ठ नेते एक बैठक घेऊन कारवाई करण्यात येईल, असं भाजप नेत्यांकडून आश्वासन देण्यात आलं. आगामी महापालिका निवडणुकीच्या आधीच झालेल्या हाणामारीमुळे पक्षातील कार्यकर्त्यांचे एकमेकांवरील रुसवे-फुगवे समोर आले आहेत.
नेमकं काय घडलं?…
भाजप कार्यकर्ते देवांग दवे यांनी सांगितलं की, ‘पालकमंत्री आशिष शेलार जानुपाडा येथे लोकांना भेटीसाठी आले होते. मागील ५० वर्षांपासून जानुपाडावासी पीडित आहेत. जानुपाडाची जमीन ही वनजमीन आहे की नाही? या वादामुळे येथील मुलभूत सुविधा मिळत नाही. त्यांना आश्वासित करण्यात आलं की, कोणत्याही प्रकारे वनाचा त्रास होणार नाही. आशिष शेलार यांनी त्यांचा प्रस्ताव पारित केला आहे’.
‘तो त्रास कमी होण्यासाठी प्रयत्न करत असताना काही स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. हा पक्षाचा अंतर्गत वाद आहे. पक्षाने त्याची दखल घेतली आहे. त्यांनी आश्वासित केलं आहे की, पक्ष यावर उचित कारवाई केली जाईल. ही सर्व घटना पक्षाच्या नेत्यांसमोर घडली आहे.त्यामुळे जास्त सांगण्याची गरज नाही. पक्ष यावर उचित कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले.