
ठाणे- राज्यात एकीकडे शहरांमध्ये गगनचुंबी इमारती बांधल्या आहेत. तर दुसरीकडे खेड्यापाड्यांत रस्त्यांचीही सुविधा नाही. गावात रस्ता नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एका गर्भवती महिलेला झोळीतून घेऊन जाताना वाटेतच तिची प्रसूती झाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पटकीचा पाडा या आदिवासी पाड्यात ही घटना घडली आहे. येथे जाण्यासाठी रस्ता नाही. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची मागणी सुरू आहे. मात्र अद्यापही रस्ता बांधण्यात आलेला नाही. रस्ता नसल्याने येथील रूग्णांना रूग्णालयात उपचारासाठी जाताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रविवारी सकाळी ११ वाजता गरोदर महिलेच्या पोटात दुखायला लागल्याने तिला कसारा रूग्णालयात दाखल करायचे होते.
मात्र रस्ता नसल्याने कापडाची झोळी करून तिला नेण्यात येत होते. आजूबाजूला जंगल असलेल्या रस्त्यातच या महिलेची प्रसूती झाली. महिलेने बाळाला जन्म दिल्यावर तिला आणि बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. गावात रस्ता नसल्याने रुग्णांना तातडीने उपचार मिळत नाही. यामुळे आतापर्यंत अनेक व्यक्तींचा बळी गेला आहे. शहापूर तालूक्यातील हे गाव मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे. मात्र तरीही तेथे अद्याप कोणत्याही प्रकारच्या सुविधा करण्यात आलेल्या नाहीत, ही दुर्देवी बाब आहे.