
रत्नागिरी- धडधाकट लोकांना लाजवेल, असा संदेश तुम्ही आम्हाला देत असता. अडचणींवर मात करत जगण्याची शिकवण तुम्ही देता, असे गौरवोद्गार पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी काढले.
सामाजिक न्याय अधिकारिता व दिव्यांगजन सक्षक्तीकरण विभाग, भारत सरकार; सामाजिक न्याय विभाग; भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी आवश्यक साहित्याचे मोफत वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात डॉ. सामंत यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, प्रांताधिकारी जीवन देसाई, महेश म्हाप यांची उपस्थिती होती. डॉ. सामंत पुढे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांसाठी वैयक्तिक योजना, तीर्थदर्शन योजना यांचा लाभ थेट मिळावा यासाठी समाजकल्याणचे अधिकारी प्रामाणिकपणे काम करत आहेत. या उपक्रमातून आम्हाला नवी ऊर्जा मिळते, आणि जीवन अधिक समाधानकारक बनते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलनाने झाली. सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी स्वागतपर भाषण, तर अभिलाषा ढोले यांनी प्रास्ताविक केले.