
रत्नागिरी: मी संवेदनशील जिल्ह्यातून शांतता असलेल्या जिल्ह्यात आलो आहे. रत्नागिरी जिल्ह्यात असलेली शांतता भंग होऊ देणार नाही, अशा शब्दात रत्नागिरी जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आपली भूमिका पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली.
रत्नागिरीत अंमली पदार्थ विकणारी साखळी तोडून टाकणार, अशा कडक शब्दात त्यांनी ड्रग्जमाफियांना इशारा दिला आहे. नितीन बगाटे शनिवारी 24 मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथून रत्नागिरीत दाखल झाले आणि त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “मी 2021 ते 2023 या काळात सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर काम केले आहे. मी रत्नागिरीतही दोन वेळा आलो आहे. त्यामुळे कोकण मला माहित आहे. मी यापूर्वी छत्रपती संभाजीनगर सारख्या जिल्ह्यात काम केले आहे. तिथून मी शांतता असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात आलो आहे. रत्नागिरीची शांतता भंग होणार नाही”, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
पोलिसांच्या फिटनेससंदर्भात बोलत असताना ते म्हणाले की, “पोलिसांनी फिट असले पाहिजे. येणाऱ्या तक्रारदाराशी व्यवस्थित संवाद साधला पाहिजे. कामात पारदर्शकता पाहिजे. एखाद्या घटनेनंतर तात्काळ प्रतिसाद देता आला पाहिजे. याकरिता मी प्रयत्नशील रहाणार आहे”, असे नितीन बगाटे यांनी सांगितले.
नूतन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी कार्यभार स्विकारला…
रत्नागिरी जिल्ह्याचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नितीन दत्तात्रय बगाटे यांनी शनिवारी आपल्या पदाचा पदभार स्विकारला. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी त्यांचे जिल्ह्यात स्वागत केले.
छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस उपायुक्त असलेले श्री. बगाटे यांची रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली होती. शनिवारी रत्नागिरीत दाखल झालेल्या श्री.बगाटे यांनी पोलीस अधीक्षक पदाची सुत्रे हाती घेतली.
नितिन बगाटे हे डॅशिंग आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी सिंधुदुर्ग येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.