
देवरूख पोलीसांच्या धडाकेबाज कामगिरीचे होतेय कौतुक; पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांच्याकडून विशेष कौतुक…
आंबा घाटातील दरोड्याप्रकरणी देवरूख पोलीसांनी आणखी दोघांच्या मुसक्या आवळल्या,एकजण अजुनही फरार; पोलीसांकडून शोध सुरू…
देवरूख- पांडुरंगा लिहिलेली थार गाडी व भारत सरकार असा लोगो असलेली इनोव्हा गाडी दोन्ही गाड्यांमधून पटापट काहीजण उतरले आणि एकाला गाडीत जबरदस्तीने कोंबून घेऊन २५ हजाराची रोकड लुटल्याचा दरोड्याचा थरारक प्रकार आंबा घाटातील दख्खनजवळ बुधवारी रात्रीच्या सुमारास घडला आहे. मात्र, देवरुख पोलीसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या काही तासातच तपासाची सूत्रे हलवत पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. म्हैस घेऊन जाणाऱ्या एका व्यावसायिकाला अडवून त्याला चाकूचा धाक दाखवत मारहाण आणि लूटमार करणाऱ्या टोळीचा देवरुख पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलीसांनी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्या इतर तीन साथीदारांचा शोध सुरू आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथील प्रथमेश तानाजी दळवी हे बुधवारी सायंकाळी रत्नागिरीतील वेतोशी येथून आपल्या बोलेरो गाडीत म्हैस घेऊन कोल्हापूरच्या दिशेने जात होते. रात्री ८.३० सुमारास आंबा घाटातील दख्खन येथे पांडुरंगा लिहिलेली थार गाडी आणि भारत सरकारचा लोगो लावलेल्या इनोव्हा गाडीतून आलेल्या आठ जणांनी दळवी यांची गाडी अडवली. आरोपींनी त्यांना गाडीतून खाली ओढून बेदम मारहाण केली आणि चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने इनोव्हा गाडीत कोंबले. तेथून त्यांना साखरपा येथील गंद्रे पेट्रोल पंपावर नेण्यात आले. तिथे आरोपींनी ५० हजार रुपयांची मागणी केली आणि दळवी यांच्या गाडीतील केबिनमध्ये ठेवलेले २५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. ‘जर पोलिसांत तक्रार केली तर याद राख,’ अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले होते.
या धक्कादायक घटनेची प्रथमेश दळवी यांनी देवरूख पोलीसांनी माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी तात्काळ तपास पथके रवाना केली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे फरहान रशिद मुल्ला (४२, रा. कोकण नगर), प्रथमेश सचिन भाटकर (२४, रा. गोळप), सर्वेश सुभाष किर (२२, रा. सोमेश्वर), धर्मलिंगम विजयकुमार नाडर (२६, रा. कुवारबांव) आणि भूषण बिपेंद्र सावंत (२६, रा. मिऱ्या) या पाच जणांना रत्नागिरी परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली. या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम पंदेरे, हे. काँ. प्रशांत मसुरकर, सचिन कामेरकर, नितीन जाधव, प्रशांत साळुंखे, गणेश सुतार आणि रेश्मा चव्हाण यांनी सहभाग घेतला. गुन्ह्यातील उर्वरित फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून या यशस्वी कामगिरीबद्दल रत्नागिरी पोलीस दलाचे कौतुक होत आहे.
आंबा घाटातील दरोड्याप्रकरणी देवरूख पोलीसांनी आणखी दोघांच्या मुसक्या आवळल्या,एकजण अजुनही फरार; पोलीसांकडून शोध सुरू…
आंबा घाटातील दरोड्याप्रकरणी देवरूख पोलीसांनी शुक्रवारी आणखी दोघांच्या रत्नागिरीतून मुसक्या आवळल्या आहेत. तर उर्वरित एकाचा शोध पोलीसांकडून घेतला जात आहे़. या दरोड्याप्रकरणी देवरूख पोलीसांनी गुन्हा घडल्याच्या काही तासातच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आठपैकी पाच आरोपींना गजाआड केले होते. त्यांचे इतर तीन साथीदार फरार होते. शुक्रवारी त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. अरबाज मजीद बांगी (वय-३१, रा. मजगांव,रत्नागिरी), शार्दूल सुनील किर (वय-२४, रा. सोमेश्वर, रत्नागिरी) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांना देवरूख न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अजूनही एकजण फरार आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*